पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे औंध ते काळेवाडी रस्त्यावर साई चौक येथे उभारण्यात आलेल्या उड्डाण पूलाचे महापौर माई ढोरे यांनी सोमवारी घाईघाईत उद्घाटन करून तो पुल वाहतुकीसाठी खुला केला होता. परंतु, पूलाचे काम अर्धवट असल्याचे सांगत ‘प्राधिकरणाने’ मंगळवारी दि.१० रोजी बंद केला आहे. दरम्यान, प्राधिकरण प्रशासनाला कोणतीही पुर्वसूचना न देता केवळ श्रेय लाटण्यासाठी महापौरांनी पुलाचे उद्घाटन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला होता.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून औंध ते काळेवाडी रस्त्यावर साई चौक येथे उड्डाणपुल उभारण्यात आहे. 700 मीटर लांबी आणि 8 मीटर रुंदी असलेल्या पुण्याकडून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, पुलाचे काम पुर्ण झाल्याचे सांगत भाजपने काल पुल वाहतुकीसाठी खुला केला होता. महापौर ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते.
पुलाचे काम बाकी असल्याचे सांगत प्राधिकरण प्रशासनाने आज (मंगळवारी) हा पुल बंद केला आहे. पुलावर प्रवेश करण्याच्या दोनही बाजुला मातीचे ढीग टाकले आहेत. वाहतुकीसाठीचा पुल बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, पुलाचे काम अद्याप बाकी आहे. राडारोडा तसेच खड्डे बुजविलेले नाहीत. पुलावरील वायरींग उघड्यावरच आहे. अशा परीस्थितीमध्ये घाईघाईने उद्धघाटन करुन पुल वाहतुकीस खुला केला होता. यामध्ये एखादा दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जिवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण? केवळ श्रेय घेण्यासाठी हा सर्व घाट घालण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला होता.