पिंपरी (Pclive7.com):- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहू येथील तुकाराम महाराज मंदिर २३ मार्चपर्यंत आणि आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही दोन्ही मंदिरे दर्शनासाठी बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख मंदिरांनी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शिर्डीचे साईबाबा मंदिर, शनि शिंगणापूरचे शनि मंदिर, पालीचे बल्लाळेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे मंदिर, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, अंबेजोगाई येथील अंबाबाई मंदिर ही मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. यामध्ये आता देहू आणि आळंदी येथील मंदिरांचीही समावेश झाला आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढल्यामुळे प्रशासन आणि स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्याचमुळे आळंदी विश्वस्तांनी १८ मार्च ते ३१ मार्च दरम्यान ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इतिहासात पहिल्यांदाच माऊलीचे मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. २० मार्चला एकादशी असून महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आळंदीत न येण्याची विनंती करण्यात आली आहे. ३१ मार्चच्या आधी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना बाधितांचा आकडा १६ वर पोहचला असून सर्वोतोपरी प्रयत्न प्रशासन घेत आहे. मात्र, आता मंदिर विश्वस्त देखील पुढे आले असून आळंदी मधील माऊलींचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दी आणि इतर कारणांतून होतो. गर्दी टाळण्यासाठी निर्णय हा घेतला आहे असून या दिवसांमध्ये नियमित असलेली पूजा दररोज पार पडेल. तसेच अन्नछत्र, भक्त निवास हे देखील या कालावधीत बंद राहणार आहे.