पिंपरी (Pclive7.com):- रविवार दि.२४ ऑक्टोंबर २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आळंदी-रायगड पालखी सोहळा समिती आयोजित ‘शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा २०२१’ होणार आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या आदर्श जीवनावर आधारित घराघरापर्यंत व मना-मना पर्यंत शिवशंभूंचे चरित्र पोहोचावं या हेतूने आळंदी-रायगड पालखी सोहळा समितीने या महाराष्ट्रात शिव शंभो ऐतिहासिक लेखी परीक्षेचे आयोजन केले आहे. कोरोना महामारीच्या संकटात नियोजित ०३ सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती. पण आता शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ०४ सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व शाळा पूर्ववत झालेले आहेत. त्यानुसार समितीद्वारे कोरोनाचे सर्व नियम पाळून दि.२४ ऑक्टोंबरला रविवारी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास शंभरच्यावर परीक्षा केंद्रांवर ३६ जिल्ह्यात एकाच वेळेस परीक्षा पार पडणार आहे.
सदरील परीक्षा ऑफलाईन होणार असून, परीक्षेत बसलेले प्रत्येक परीक्षार्थी सांस्कृतिक पोशाख परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर आधारित प्रश्नपत्रिका सोडवणार आहेत.
सदर परीक्षा स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान मधील समितीच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख व पदाधिकारी यांच्या नियोजनाखाली होणार आहे.
आळंदी-रायगड पालखी सोहळा समिती महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवशाहीर आकाशदादा भोंडवे पाटील तसेच राजदादा तपसे यांनी परीक्षेस बसलेल्या सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी खूप सार्या शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस ही शुभेच्छा दिल्या.