पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचे नेतृत्व करणाऱ्या सर्व माजी महापौरांनी महापौरपदाच्या कारकीर्दीत केलेले कार्य आणि दिलेले योगदान या शहराच्या इतिहासात अधोरेखित झाले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शहराचा विकास झपाट्याने झाला असून राष्ट्रीय पातळीवर या शहराचा नावलौकिक वाढून स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत झाली आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासूनच्या सर्व माजी महापौरांची विचारविनिमय बैठक महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडली. यावेळी माजी महापौर कृ. शं. उर्फ तात्या कदम, कविचंद भाट, संजोग वाघेरे पाटील, आर.एस.कुमार, अनिता फरांदे, हनुमंत भोसले, अपर्णा डोके उपस्थित होते.
या बैठकीस आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे उपस्थित होते.
सर्व उपस्थित माजी महापौरांनी या बैठकीत त्यांचे विचार मांडले. शहराचे नेतृत्व केले याचा सार्थ अभिमान आहे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक महापौरांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या जडणघडणीत वाटा उचलला आहे. या शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी महापौरांनी त्यांच्या काळात चांगले उपक्रम राबविले. त्यांच्या कामास प्रशासनानेदेखील चांगली साथ दिली. त्यामुळे नागरिकांची सेवा करता आली याबद्दल समाधानी असल्याचे माजी महापौरांनी आपल्या मनोगतात सांगितले. कोविड काळात केलेल्या उपाययोजनाबद्दल त्यांनी महापालिकेचे कौतुकही केले. तसेच दर तीन महिन्यांमध्ये माजी महापौरांची बैठक घ्यावी, माजी महापौरांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जावी, महत्वाच्या धोरणांमध्ये माजी महापौरांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा, दिवंगत महापौरांच्या निवासस्थानी पुणे महापालिकेच्या धर्तीवर फलक लावण्यात यावेत, प्राधिकरणाच्या प्रशासकीय कामकाजासाठी महापालिकेने जागेसह सुविधा उपलब्ध करुन द्यावी, पाणीपुरवठा धोरणात समानता आणावी, आदी सूचना उपस्थित माजी महापौरांनी यावेळी केल्या.
आजच्या बैठकीत केलेल्या सूचनांची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल असे आयुक्त राजेश पाटील यावेळी म्हणाले. या शहराची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी यासाठी माजी महापौरांच्या सूचना तसेच मार्गदर्शन महत्वपूर्ण राहील. माजी महापौरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे कामाचा उत्साह वाढला असल्याचेही आयुक्त पाटील म्हणाले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, सर्व माजी महापौरांसमवेत विचार विनिमय करुन कारभार करावा अशी इच्छा होती, परंतु त्यावेळी कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. आजपर्यंतच्या सर्व महापौरांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या कामामुळे आपल्या शहराच्या विकासाचा वेग इतर शहराच्या तुलनेने अधिक राहिला आहे. प्रशस्त रस्ते, नद्यांवरील पुलांची उभारणी, उद्याने, विविध उपक्रम, उड्डाणपुल, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक व क्रीडा विषयक सुविधा, सांस्कृतिक सुविधा असे अनेक प्रकल्प, उपक्रम, योजना राबविल्यामुळे शहराचा कायापालट झाला आहे.
या शहरात आलेल्या नागरिकाला या शहराचा विकास नजरेस पडतो. यामध्ये महत्वपूर्ण योगदान या शहराचे नेतृत्व करणा-या सर्व महापौरांचे आहे. सध्या शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने विविध योजना हाती घेतल्या आहेत. कच-याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. शहरात रस्ते महत्वाचे असल्याने सुरळीत दळणवळणासाठी रिंग रोडची आवश्यकता आहे. नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने मोकळ्या आरक्षित जागा विकसित कराव्यात अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी यावेळी केली. शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांचा सहभाग आणि सहकार्य गरजेचे असून माजी महापौरांनी यापुढेही मार्गदर्शन आणि योगदान देत रहावे असे महापौर माई ढोरे यावेळी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले. सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर आभार स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांनी मानले.