पिंपरीमधील हॉटेलचे ‘कराची’ हे पाकिस्तानी शहराचे नाव तात्काळ हटवा, थेट अमित शहांकडे केली मागणी
पिंपरी (Pclive7.com):- देशामध्ये शहरांचे नामांतरण करण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आग्रही असल्याचे आपण पहिले आहे. तसेच महाराष्ट्रात देखील औरंगाबाद, उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. अनेक मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व संघटनांनी शहरांच्या नामांतरणाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. नामांतर होईल कि नाही हा भाग वेगळा परंतु यावर राजकारण नक्कीच होत आहे. अनेकांच्या दृष्टीने नामांतरणाचा विषय अस्मितेचा, स्वाभिमानाचा असलयाचे सांगितले जाते.

पिंपरी मध्ये देशातील सर्व राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत. त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. पिंपरी हे एकप्रकारे मिनी इंडिया समजले जाते. पिंपरी चिंचवड मधील “पिंपरी” मध्ये साई नगर या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून “कराची” हॉटेल आहे. कराची हे शहर पाकिस्तानमधील मोठे शहर आहे. तसेच पाकिस्तानच्या सिंध प्रांताची राजधानी आहे. भारत देशामध्ये “कराची” हे नाव असण्याचे काय कारण नाही. भारतातील कोणाची ती अस्मिता नाही कि अभिमान नाही. त्यामुळे पिंपरी मधील हॉटेलचे “कराची” हे नाव तात्काळ बदलण्यात यावे अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी केली आहे.
पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असतो. आपल्या देशाच्या बॉर्डरवर अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा अनेकवेळा प्रयत्न करीत असतो. बॉर्डरवरील काही गावांमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झालेले आहेत. त्यामध्ये अनेक सैनिक शहीद झालेले आहेत. अनेक नागरिकांचे बळी गेलेले आहेत. भारतीय नौसेनेचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत. त्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितलेली होती. परंतु पाकिस्तान कडून जाणीवपूर्वक कुलभूषण जाधव यांच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणत आहे. असे असताना आम्ही देशप्रेमी नागरिक पाकिस्तानचा वेळोवेळी निषेध करीत असतो. परंतु त्याच पाकिस्तानमधील “कराची” या शहराचे नाव देऊन पिंपरी मधील काही हॉटेल व स्वीट होमच्या मालकांनी अनेक भारतीयांचे मन दुखावले असून त्याचे “कराची प्रेम” दिसून येत आहे.
त्यामुळे भारत विरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानमधील “कराची” शहरचे नाव हॉटेल व स्वीट होम मालकाने त्वरित बदलावे व देशाप्रती प्रेम असल्याचे दाखवून द्यावे. सदर हॉटेलचे नाव आठवड्याभरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी बदलण्यात यावे. अन्यथा पिंपरी चिंचवड मधील समस्त देशप्रेमी नागरिकांच्या वतीने रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी येथील “शगुन चौक” या ठिकाणी “तिरंगा आंदोलन” करण्यात येईल असे अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group