पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षणासाठी संपूर्ण शासन व्यवस्थेसमोर खडे ठाकलेले मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून काढले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर साखळी उपोषण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भोसरी गाव येथे आज (दि.२९) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास लांडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी भोसरीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या ठिकाणी माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित राहत सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी विलास लांडे म्हणाले, जरांगे पाटील नावाच्या माणसाने महाराष्ट्र हादरून सोडला आहे. त्यांचा आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. सरकार, मंत्रिमंडळ अस्वस्थ आहे. प्रत्येक मराठा तरुण मागील अनेक वर्षांची खदखद रस्त्यावर घेऊन उतरत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनासमोर सरकारला गुडघे टेकवावेच लागतील. त्यानंतर आरक्षणही मिळेल. पण जरांगे पाटील यांनी मागील चार दिवसांपासून अन्न पाणी वर्ज्य केल्याने माझ्यासारखा कार्यकर्ता अस्वस्थ आहे. जरांगे पाटील यांनी तब्बेतीला जपून महाराष्ट्रातील तरुणांना दिशा द्यावी. महाराष्ट्रातील मराठा बांधवांना विश्वासार्ह चेहरा कित्येक वर्षांनी सापडला आहे. अशा नेतृत्वाला आम्हाला गमवायचे नाही.