पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर, रामनगर, विद्यानगर, आनंदनगर, काळभोरनगर व आसपासच्या परिसरातील विजेच्या प्रश्नाबाबत व्यापारी व नागरिक प्रतिनिधी यांची महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात बैठक झाली. मागील एक वर्षापासुन वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अनेकवेळा पत्र व्यवहार, अर्ज विनंत्या केल्या. यापुढे अर्ज विनंत्या केल्या जाणार नाही. “काम करा नाहीतर खुर्ची खाली करा.”असे स्पष्टपणे सांगण्यात आले. या आधी सर्व पक्षीय मोर्चा नागरी हक्क कृती समितीच्या वतीने काढून आज 9-10 महिने झाले तरी परिसरातली विजेचा प्रश्न सुटला नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले गेले.

एका महिन्यात वीजपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने ठोस कारवाई झाली नाही तर कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा निवेदनाद्वारे दिला गेला आहे. वीज ही मूलभूत सेवा असून आपल्या कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे. परिसरातील परिसरातील व्यापारी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ व इतर नागरिक गेल्या जवळपास एक वर्षापासून वीजेच्या लपंडावाचा त्रास सहन करत आहेत. परंतु महावितरण कंपनीने प्रत्येकवेळी आश्वासने दिली, मात्र आजतागायत कसलाही ठोस उपाय किंवा कार्यवाही झालेली नाही, ही बाब अत्यंत दु:खद आणि संतापजनक आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे, नागरिकांचे दूध, अन्नपदार्थ, भाजीपाला व अन्य नाशवंत वस्तू खराब होत आहेत, ज्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे. संध्याकाळी वीज नसल्याने परिसरातील नागरिकांना विशेषतः ज्येष्ठांना व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विजेचे बिल थकविल्यास तत्काळ कारवाई करणारे अधिकारी, ग्राहकांना नियमित व अखंडित वीजपुरवठा करण्यात का अपयशी ठरत आहेत, हा आमच्या मनात निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे. जर एका शहरी भागातील वीज प्रश्न सुटविण्यास एक वर्षापेक्षा अधिक वेळ लागत असेल, ट्रान्सफार्मर बसण्याच्या नावाखाली केवळ फक्त सांगाडे उभे करून नागरिकांनी दिशाभूल करणे व वेळ काढणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. आपण नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची योग्य दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती केली गेली.
यावेळी नगरी हक्क कृती समितीच्या वतीने कमलेश लुंकड, महादेव नेर्लेकर, कमलेश दिलीप मुथा, अनिल राऊत, दत्ता देवतारासे, राहुल दातीर पाटील, गुलशन सुतार, रमेश जाट, सतीश शर्मा, राजू दळवी, आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group