पिंपरी (Pclive7.com):- परगावी अडकलेल्यांच्या सुटकेसाठी पोलीस पास नियम शिथिल करण्याची मागणी जेष्ठ पत्रकार व शिवसेनेचे माजी शहर संघटक नंदकुमार सातुर्डेकर यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात सातुर्डेकर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन मुळे संचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. आता तर लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवल्याने बाहेरगावी अडकून पडलेल्या पत्रकार, विद्यार्थी, कामगार, आदी समाज घटकांना स्वगृही जाण्याची कोणतीही सोय नाही. लॉकडाऊन काळात नागरिकांना केवळ अत्यावश्यक कारणांसाठी (उदा. मृत्यू, वैदयकीय) राज्यातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यासाठीचा परवाना देण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिले. या आदेशानुसार पोलीस विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र यामध्ये जाचक अटी घालण्यात आल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.
अडकलेल्या नागरिकांना आपापल्या मूळ गावी जाण्यासाठी राज्य सरकारने नियम शिथिल केले पाहिजेत. दि.२० एप्रिलनंतर याबाबत काथ्याकूट करण्यापेक्षा आतापासून काही तयारी केल्यास लोकांची सुटका होईल, लॉकडाऊन २ घोषित होताच मुंबईत परप्रांतीय मजूर रस्त्यावर आले. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारने या कामगारांना घरी परतण्यासाठी २४ तास विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. परंतु केंद्राच्या नाकर्तेपणामुळे मजूर रस्त्यावर आल्याचे ट्विट केले आहे. त्याचा संदर्भ देत सातुर्डेकर यांनी राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्रातील गावोगावी अडकून पडलेल्या लोकांसाठी पोलीस परवाने पास देण्याची पद्धत सुटसुटीत करण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे केली आहे.