पिंपरी (Pclive7.com):- “दहावी, बारावीचे विद्यार्थी गुण किती पडतात यावर पुढील शिक्षण ठरवितात. हे अतिशय चुकीचे आहे. गुण किती पडले यावर सायन्स, कॉमर्स की कला शाखा घ्यायची हा निकष ठरू शकत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिकलेले विषय कागदावर लिहून काढावेत. आपल्याला कोणत्या विषयात रुची आहे, ते निवडावे. स्वतःचे एनालिसिस करून करिअरची दिशा निवडावी. सायन्स म्हणजे करीअर यातून सर्वांनी बाहेर यावे. तीनही शाखेतून करिअरच्या अमाफ संधी आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली आवड व नावड याची सांगड घालून क्षेत्र निवडावे आणि प्रचंड कष्ट केल्यास नक्कीच यश मिळेल”, असे मार्गदर्शन शिक्षणतज्ञ विवेक वेलणकर यांनी केले.
माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या वतीने आकुर्डीतील कै. मल्हारराव कुटे अध्यात्मिक व सांस्कृतिक भवनात शनिवारी (दि.16) दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. खासदार श्रीरंग बारणे आणि शिक्षणतज्ञ विवेक वेलणकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा बॅग, शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आयोजक प्रमोद कुटे, उद्योजक रवी नामदे, झिशान सय्यद उपस्थित होते. सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आकुर्डीतील मुलाचा विशेष सन्मान करण्यात आला.
विवेक वेलणकर म्हणाले, “सायन्स, कॉमर्स आणि कला या तीनही शाखेत अमाप संधी आहेत. आपण कोणत्या क्षेत्रात आहोत. त्यातील संधी शोधावी. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करता येतो. आयटीआय झाला म्हणजे शिक्षण थांबले असे समजू नये. दहावीनंतर केलेल्या डिप्लोमाचा शिक्षणासाठी चांगला फायदा होतो. थेटपणे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला जाता येते. डिप्लोमानंतरही स्वयंरोजगार, रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतात. त्यामुळे डिप्लोमा असनुही उत्तम करिअर करता येते. बारावीनंतर सायन्स, कॉमर्स, कला शाखेत शिक्षण घेतल्यानंतर वकिलीचेही शिक्षण घेता येते. वकिली हा व्यवसाय आहे. प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे पैसे कमवू शकतो. हॉटेल मॅनेजमेंटही करता येते. ज्यांच्या हातात कला आहे. त्यांनी कलेकडे वळावे. अर्थशास्त्रात देखील मोठी संधी आहे. पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट आहे. अर्थशास्त्रात मास्टर्स केल्यानंतर विविध संधी मिळू शकतात”.
“स्पर्धा परीक्षेसाठी केवळ पदवी लागते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सायन्स घेऊ नये. कला, कॉमर्स शाखाच घ्यावी. जेणेकरून सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला वेळ मिळेल. बारावीनंतर एमबीए देखील विद्यार्थ्यांना करता येईल. सायन्स म्हणजे करीअर यातून सर्वांनी बाहेर यावे. कला, कॉमर्स शाखेत देखील चांगले करिअर करता येते. कॉमर्स झाल्यावर सीए, सीएस होता येते. हे शिक्षण डॉक्टर, इंजिनिअरिंग पेक्षा चांगली संधी देते. त्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. वैद्यकीय शिक्षण घेता येते. व्हेटर्नरी डॉक्टरचीही शिक्षण घेता येते. डिफार्मशीचे शिक्षण घेता येते. कोरोना काळात सर्व बंद होते. पण, केवळ मेडिकल दुकाने चालू होती. बारावीनंतर संरक्षण क्षेत्रात जाण्याचीही संधी आहे. त्यासाठी नीट परीक्षा द्यावी लागते. पण, ही खूप चांगली संधी आहे. दहावीनंतर मुलींसाठी विविध कोर्स आहेत. त्यामुळे मुली कोर्स करून देखील उत्तम करिअर करू शकतात” असे महत्वपूर्ण मार्गदर्शन वेलणकर यांनी केले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “आई-वडील आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतात. स्वतःच्या हौस मजेला मुरड घालतात. विद्यार्थ्यांला गुण कमी मिळाल्यानंतर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी पालकांना अनेकांकडे जावे लागते. हातपाय पडावे लागते. त्यामुळे शिक्षणकाळात विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणाकडेच लक्ष्य द्यावे. विद्यार्थ्यांनी प्रचंड वाचन करावे. जगाची माहिती घ्यावी. सोशलमीडियाचा केवळ शालेय शिक्षणासाठीच वापर करावा. वेळ गतिमान जीवनाला रोखू शकत नाही. त्यामुळे अभ्यास करून उच्चशिक्षित व्हावे. माजी नगरसेवक प्रमोद कुटे लोकाभिमुख उपक्रम घेतात. त्यांच्या रूपाने आकुर्डी भागाला चांगला लोकप्रतिनिधी मिळाला आहे”.