महात्मा फुले महाविद्यालयात अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा मेळावा
पिंपरी (Pclive7.com):- बचत, गुंतवणुकीच्या पलिकडे आपण अर्थशास्त्र समजून घेत नाहीत. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आणि नोकरी, व्यावसाय एवढ्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येकामध्ये आर्थिक साक्षरता आणणे, ही काळाची गरज आहे. तरच समृध्द समाजाची निर्मिती होऊ शकते, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुनिल सालके यांनी मांडले.
पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगताप, प्रा. उध्दव घोडके, उपप्राचार्य मृणालिनी शेखर, प्रा. अनिकेत खत्री, अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. भारती यादव, डॉ. प्रतिमा कदम आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. जगदाळे म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयासाठी एकत्र येणं. ही भावना कोणत्याही शिक्षण संस्थेसाठी महत्त्वाची आहे. रयत शिक्षण संस्था गोर-गरिब विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न करते. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये. यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी प्राध्यापक व आजी-माजी विद्यार्थी या संस्थेत पुढाकार घेतात. हे आजच्या घडीला आशादायी चित्र आहे.
प्रा. उध्दव घोडके म्हणाले, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून नव्याने येणा-या विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला पाहिजे. त्यातून नवनवीन विद्यार्थी घडू शकतील.
माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. डॉ. भारती यादव यांनी प्रास्ताविक केले. अॅड. अशोक डोंगरे, चंचल गायकवाड, नागनाथ रोकडे, प्रा.नवनीत हजारे, प्रा. मिना बोकन, सुभाष हेगडे, सुरेश पाटील, संजिवन गायकवाड यांनी संयोजन केले. अमोल काकडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतिमा कदम यांनी आभार मानले.