महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने कामगार दिनानिमित्त स्व. अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन..!
महापालिकेच्या त्या कृतीचा संघटनेने नोंदविला निषेध
पिंपरी (Pclive7.com):- राज्याच्या जडणघडणीमध्ये कष्टकरी, माथाडी कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यांचा उत्कर्ष आणि विकासासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना राज्य पातळीवर सकारात्मक कार्य करीत असून आज १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, कामगार चळवळींच्या गौरवासाठीचा महत्वाचा विशेष दिन आहे. दरम्यान आजवर कामगारांसाठी अनेक संघटनांनी भांडवलदरांशी लढा दिला. या लढ्यातून अनेक कामगार चळवळी घडल्या. त्याचे फलित म्हणून कामगार संघटनांची निर्मिती झाली. आज देशभरात अनेक कामगार संघटना कामगारांचे प्रतिनिधित्व करत आहे. म्हणूनच औद्योगिक क्रांतीनंतरच्या काही कालखंडानंतर आज कामगारवर्ग स्थिरस्थावर झालेला दिसतोयं, असे प्रतिपादन कामगार नेते तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी केले.

जागतिक कामगार दिनानिमित्त आज १ मे रोजी चिंचवडच्या केएसबी चौकात कामगार भूषण स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. त्यावेळी इरफानभाई बोलत होते. यावेळी वाहनफेरी, मेळावे आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी कामगार चळवळीतील कामगार नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमास महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, भिवाजी वाटेकर, प्रविण जाधव, पांडुरंग कदम, पांडुरंग काळोखे, अप्पा कौदरे, सर्जेराव कचरे, सतीश कंठाळे, श्रीकांत मोरे, नागेश व्हनवटे, आशोक साळुंखे, शंकर मदने, बबन काळे, अमित पासलकर, ऊद्धव सरोदे, गोरक्षनाथ दुबाले, सुनिल सावळे, समर्थ नाईकवाडे, दादा कदम, विठ्ठल ईंगळे, ज्ञानदेव पाचपुते, सोमनाथ फुगे, चंद्रकांत पिंगट, चंदन वाघमारे, अक्षय शेलार, किशोर कोळेकर, कैलास तोडकर, रत्नाकर भोजने, ज्ञानदेव गवते, सखाराम हारगुले व संघटनेचे सर्व पदाधिकारी, मुकादम, व सभासद कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
पुढे बोलताना इरफानभाई म्हणाले, कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. पूर्वी उपजीविकेच्या शोधार्थ आलेल्या अनेक कामगारांनी डोक्यावरून विविध गोदामांमध्ये, बाजारांमध्ये ओझे उचलण्याचे काम केले. मात्र, या कामासाठी त्यांना अत्यंत कमी मजुरी मिळायची. अनेक कामगारांना शंभर ते दीडशे किलोपर्यंतचे ओझे उचलावे लागायचे. या अतिकामामुळे कामगारांना विविध आजारांना सामोरे जावे लागायचे. अंगात ताकद असेपर्यंत कामगार कामे करायचे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नव्हती. आवश्यक सुविधा, पुरेसे वेतन, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षिततेच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी साठच्या दशकात संघर्षाला सुरुवात केली. कामगारांना त्यांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी नेटाने लढा देऊन माथाड़ी कायदयाचे जनक ठरले त्यामुळेच आज माथाड़ी कामगार वर्ग सुरक्षित जीवन जगतोय.
कामगार दिनी अण्णासाहेबांच्या पुतळ्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष…आज जागतिक कामगार दिन असूनही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला त्याचा विसर पडला. गेल्याच वर्षी मोठ्या थाटामाटात अण्णासाहेबांच्या पुतळ्याचे लोकार्पण पालिकेने केले होते. मात्र, आज पुतळा परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही पालिकेच्या या कृतीचा निषेध करतो.– इरफानभाई सय्यद, कामगार नेते.
























Join Our Whatsapp Group