पिंपरी (Pclive7.com):- केंद्र शासन पुरस्कृत योजनांची परिपूर्णता साध्य करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” चे राज्यात आयोजन करण्यात आले असून विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या विविध योजना पोहोचतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ वाहनाचे उदघाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, उल्हास जगताप, माजी उपमहापौर तुषार हिंगे,माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, उप आयुक्त अजय चारठणकर, मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे,क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे,अमित पंडित,अण्णा बोदडे, अंकुश जाधव,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्ते बिभीषण चौधरी,सुनील कदम, यांच्यासह समाज विकास विभागातील अधिकारी कर्मचारी, महिला बचत गट प्रमुख,स्थानिक नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी, मान्यवरांनी महिला बचत गटाद्वारे लागलेल्या स्टॉलची पाहणीही केली.
अतिरिक्तआयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले की, नगर विकास विभागाकडून केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी), प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), स्वच्छ भारत अभियान (नागरी), प्रधानमंत्री ई- बस, सेवा व अमृत योजना इ. योजना राबविल्या जातात. या प्रधानमंत्री महत्वाकांक्षी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परीपूर्णता साध्य करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत “विकसीत भारत संकल्प यात्रा” चे आयोजन करणेबाबत केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत. सदर वाहन यात्रा आजपासून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत ६४ ठिकाणी काढण्यात येणार आहे. सदर यात्रेद्वारे योजनांच्या लाभार्थ्यांची ऑनबोर्डिंग करणे, पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, त्यांचा तपशील आधार कार्डसह एकत्रित करणे, लाभार्थ्यांना योजनांशी जोडणी करणे यासह इतर योजनांसाठी महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या सहकार्यातून कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थितांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीस “भारतास २०४७ पर्यत आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू,भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगू तसेच देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू” अशी शपथ घेतली.शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
विकसीत भारत संकल्प यात्रेचे वाहन उद्या २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शिवशंभो उद्यान,संभाजीनगर येथे जाणार असून दुपारी ३ वाजता ते विरंगुळा केंद्र,मोरवाडी या परिसरात असणार आहे.तर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आकुर्डी हाॅस्पीटल येथे तर दुपारी 3 वाजता आकुर्डीतील महात्मा जोतीराव फुले प्राथमिक शाळेच्या परिसरात असेल अशी माहिती उप आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली असून १ डिसेंबर नंतरचा तपशील उद्या पाठविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

























Join Our Whatsapp Group