पिंपरी (Pclive7.com):- तळवडे येथील अग्निकांडाला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केली आहे.
तुषार कामठे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, तळवडे येथे विनापरवाना अनधिकृत असे फटाक्याची फॅक्टरी चालवली जात होती. सदर फॅक्टरीमध्ये केकवर लावण्यात येणारे आतिशबाजी करणारे कॅण्डल बनवण्याचा उद्योग राजरोसपणे चालू होता. आज या फॅक्टरीमध्ये भीषण अशी आग लागली. त्या आगीमध्ये होरपळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच बरेच जण गंभीर भाजले गेले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने बऱ्याच ठिकाणी आशा अनधिकृत कंपन्या चालवल्या जातात. अग्निशामक विभागातर्फे देखील कोणाचेही या गोष्टींवर नियंत्रण नाही. छोटे छोटे फटाका व्यवसाय रस्त्यावर फटाका विकताना ज्या परवानग्या काढल्या जातात त्यामध्ये प्रचंड अशी मानसिक आणि आर्थिक पिळवणूक त्या गोरगरीब होतकरू तरुणांची होत असते. परंतु अशा प्रकारे अनाधिकृत फटाक्यांच्या कारखान्यावर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून होताना दिसत नाही.
यासंदर्भात तुषार कामठे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना चौकशी करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून शहरांमध्ये पुन्हा अशा घटना घडणार नाहीत असे तुषार कामठे यांनी म्हटले आहे.