पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचे आधी अपहरण मग अनैसर्गिक कृत्य करून त्याची हत्या करण्यात आल्याचा धोकादायक प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला अपघातात झाल्याचा बनाव नराधमाने केला होता. मात्र वाकड पोलिसांनी तपास करत या प्रकरणाचं बिंग फोडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नराधम आरोपी पवन पांडे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नराधमाने वाकड हद्दीतून आठ वर्षीय मुलाचे शनिवार (दि.२४) रोजी रात्री अपहरण केले होते. नराधम पांडे हा रसवंती गृहात तीनचं दिवसांपूर्वी कामाला आला होता. त्याच ठिकाणी पीडित खेळत असायचा, हे पाहून नराधमाने त्याला एकदा ऊसाचे रस दिले. असं करून मुलाशी जवळीक साधली आणि शनिवारच्या रात्री साडे आठच्या सुमारास त्याचं अपहरण केले.
आरोपी त्यामुलाला वाकड येथून पाषाण तलावालगत घेऊन गेला. रात्रीच्या काळोखात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. तोपर्यंत पीडित मुलाच्या कुटुंबियांकडून त्याची शोधाशोध सुरू झाली. अखेर रात्री दहा वाजता पीडिताच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले. दुसरीकडे रात्री अकराच्या सुमारास रसवंती गृहाच्या मालकाने पांडेला फोन करून गायब मुलाला पाहिलं होतं का? अशी विचारणा केली. मात्र मला त्याबाबत कल्पना नसल्याचं तो म्हणाला. पण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले, त्यात पांडे मुलाला खुणावत असल्याचं अन मुलगा त्याच्या पाठीमागे चालत निघाल्याचं अन् पुढं जाऊन दोघे अचानकपणे गायब झाल्याचं दिसून आले.
सकाळी वाकड पोलिसांनी बावधन गाठलं आणि पांडे राहत असलेल्या घरात जाऊन त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीचे तीन तास त्याने तोंडचं उघडले नाही, मग पोलिसी खाक्या दाखवताच तो बोलू लागला. माझ्या कडून अपघात झाला अन त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार, म्हणून मी मृतदेह पाषाणमध्येचं फेकल्याचं स्पष्टीकरण त्याने दिलं. मग पोलिसांनी त्याने विश्वासात घेतलं अन घटनास्थळ गाठलं. तेंव्हा पांडेने अपघाताचा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं. या नराधमाने निष्पाप मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचं उघड झालं. वाकड पोलिसांच्या तपासात पांडेंचे बिंग फुटले. पण या दुर्दैवी घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे.