पिंपळे सौदागर (Pclive7.com):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समरसतेच्या दृष्टीने जे कार्य केले, त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपल्या जीवनात वाटचाल केली पाहिजे असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केले. पिंपळे सौदागर येथील श्री संत ज्ञानेश्वर ब्राह्मण सभेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि चैत्रगौरीच्या हळदी – कुंकू कार्यक्रमात ते बोलत होते.
रविवार दि.१४ रोजी कुणाल आयकॉन रोडवरील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर आयोजित या कार्यक्रमात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु विलास भाले, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विलास जोशी तसेच वृषाली चांदोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी चैत्रगौरीचे पूजन, दिप प्रज्वलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
विजया तारे आणि वासंती जोशी यांनी चैत्र गौरी पूजनाची उपस्थितांना माहिती दिली. ब्राह्मण समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती मुकुंद डाऊ, चेतन डाऊ, इंद्राणी सिन्हा, अभिजित जोशी, स्नेहा चिंचवडकर, दिपाली कुलकर्णी, लक्ष्मी पारखी, बच्छराज शर्मा यांचा नववर्षाच्या निमित्ताने नाना काटे यांच्याहस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय न्यायाधीश यांनी केले तर श्रीकृष्ण निलेगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल कुलकर्णी, रमेश भट, तारकेश्वर गोडबोले, स्नेहा चिंचवडकर यांनी परिश्रम घेतले.