पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे उन्नती सोशल फाउंडेशन, यशसिद्धी, आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन आणि माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिनानिमित्त शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी कारगील युद्धात राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांच्या वीर पत्नी – मंगला साळुंके, जयश्री धनवडे, पद्मिनी भालेराव, नैना सकट आणि प्रतिमा भाटे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या त्याग, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला मानाचा मुजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श प्रत्येकाने जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.
नगरसेविका डॉ. कुंदा भिसे यांनी सांगितले की, राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे प्रेरणादायी कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमात पी. के. इंटरनॅशनल स्कूल, चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि अण्णासाहेब मगर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, नाटिका व विविध सादरीकरणांद्वारे उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली.
यावेळी मेजर जनरल सुधाकर चिन्नावार, कॅप्टन बाबू पोलके, ह.भ.प. विजूशेठ जगताप, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. कुंदा भिसे, अनिता काटे, स्नेहा कलाटे, जयनाथ काटे, जगन्नाथ काटे, संस्थापक संजय भिसे, संतोष वानखेडे आदी मान्यवरांच्या हस्ते कारगील विजय स्तंभाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन करण्यात आले.




















Join Our Whatsapp Group