पिंपरी (Pclive7.com):- जीवनातील १६ ते २२ हे वय जीवनातील अती महत्वाचे षटक आहे, यात कष्ट घेणारा पुढे याची फळे चाखेल अन्यथा आयुष्यभर त्या उणीवांची बिले चुकवावी लागतील असा सल्ला इंडियासॉफ्ट टेकनॉलॉजिजचे राष्ट्रीय व्यवस्थापक व प्रेरक व्याख्याते सुनील चोरे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना दिला.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय,थेरगाव येथे इ. १० वीच्या शुभेच्छा समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे पदाधिकारी गतिराम भोईर, नितीन बारणे, तसेच चेतन चित्ते, तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नटराज जगताप, माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी बावीस्कर, पुष्पा जाधव उपस्थित होते.
सुनील चोरे यांनी पुलवामातील जवानांचे बलिदान, शिक्षक-पालकांचे कष्ट आणि याच १६ व्या वयात तोरणा जिंकून स्वराज्य निर्मितीचं स्वप्नं पाहणारे शिवराय यांचे दाखले देत आपली स्वप्ने कोणती ? अशी भावुक साद विद्यार्थांना घातली. प्रयत्नांना मोठ्या स्वप्नांचे पंख द्या. उत्कृष्टतेचा ध्यास आणि प्रामाणिक कष्टामुळे क्षेत्र कुठलेही असो ती स्वप्ने नक्की साकारतील असे प्रेरक विचार त्यांच्या खास शैलीतून ऐकताना मोठ्या संख्येने जमलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक व उपस्थित भारावले होते.
विद्यार्थी अंकित कापुरे, अनिकेत कांबळे, निकिता सुबुगडे, श्वेता पांढरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कष्टाला पर्याय नाही असे प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी बावीस्कर यांनी प्रास्तविकातून सांगितले व पाहुण्यांचा स्वागत परिचय करुन दिला. सूत्रसंचालन त्रिवेणी खामकर यांनी तर शिक्षक मनोगत सोनाली टिकले तर आभार सुनीता घोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन अंजली सुमंत यांनी केले तर वनिता जोरी, योगिनी नरुटे, योगेश्वरी महाजन,. स्वाती बांगर, नलिनी पंडित, गायकवाड, अनिता ठोके यांचे सहकार्य मिळाले.