पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील एका निष्ठावंत कार्यकर्त्याला थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं पत्र आल्याने सध्या या पत्राची शहरात चांगलीच चर्चा आहे. भाजपमधील निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या माऊली थोरात यांना हे पत्र आलेले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याची घोषणा होताच माऊली थोरात यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचार सुरू केला होता. त्याची दखल थेट अमित शहा यांनी घेत लोकसभेत त्यांनी केलेल्या कामाचे पत्र पाठवत पोचपावती दिली आहे. भाजपमध्ये कार्यकर्त्यांना किती महत्त्व दिलं जातं हे अमित शहा यांच्या या पत्रावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
यापूर्वीही शहरात आलेल्या राज्यातील इतर मोठ्या नेत्यांनी पक्षाचं कार्यकर्त्याकडे बारिक लक्ष असतं, याचे संकेत अनेकदा दिलेत. त्याचीच प्रचिती काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी शहरात आल्यावर दिली होती. “संघटनेत काम करत असताना भाजपात प्रत्येकाच्या कामाची नोंद ठेवली जाते. १० हजार डोळे आणि २० हजार कान हे प्रत्येकाचे काम टिपत असतात” असं वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
आता खुद्द अमित शहा यांनी माऊली थोरात यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला पाठवलेल्या पत्रामुळे भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्याचे किती महत्त्व आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.