पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामे मंदावली, निविदा दरामध्ये तफावत ठेवत संशयास्पद भूमिका घेत असल्याबाबत गंभीर आरोप करत प्रशासनावर नियंत्रण नाही. अनेक विकासकामे प्रलंबित असल्यामुळे प्रशासनाच्या विरोधात जाहीर भूमिका घेणार्या सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी नुकताच इशारा दिलेला होता. मागील तीन वर्षात शिष्टाचारी वाटणारे आयुक्त आता भष्ट्राचारी वाटू लागले का? मर्जीतील ठेकेदारांना निविदा मिळत नसल्यामुळे भाजप आमदारांचा तिळपापड झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर नाव न घेता केला आहे.
आमदार जगताप यांनी पालिकेतील विविध विकासकामांचे पत्रामागून पत्रे देऊन चौकशी सुरू केली. शहरात झालेल्या किंवा चालू असलेल्या विविध कामांची चौकशी करण्याचा सपाटा चालविलेला आहे. मागील तीन वर्षापासून हे आमदार झोपले होते का? आताच अस काय अघटीत घडले आणि त्यांना साक्षात्कार झाला कि आयुक्त अकार्यक्षम आहेत. त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. भाजपच्या आमदारांना खरोखरच जनतेचा कळवळा आहे की मर्जीतील ठेकेदारांना निविदा मिळत नसल्यामुळे तिळपापड झालाय? की टी.डी.आर होत नाहीत याचा राग आला आहे. नक्की यांचा रोष जनतेसाठी आहे की स्वत:साठी आहे हे जनतेने ओळखावे. मागील तीन वर्षात आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर सत्ताधारी भाजप आमदार व नगरसेवक खूश होते. मग आताच असे काय झाले कि आयुक्त अकार्यक्षम झाले.
विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे हे २०१७ पासून आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत होते. त्यावेळी मात्र सत्ताधाऱ्यांना आयुक्त कार्यक्षम आहेत असा दाखला देत होते. पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना विविध विकास कामांचा डोंगर उभा केला पाणी, कचरा संकलन, आरोग्य इत्यादी बाबत कधीच तक्रार आली नव्हती. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरास केंद्र सरकार, राज्य सरकाराचे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शहर स्वच्छता पुरस्कार बरोबर सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून या शहराचा नांवलौकीक प्राप्त झालेला होता. आता भाजपच्या सत्ताकाळामध्ये पुरस्कार सोडाच पण पाण्यासारख्या मुलभूत सुविधाही नीट शहरवासियांना मिळत नाही.
मागील वर्षी शहरात नद्यांना महापूर आला तरी मनपाने आजअखेर एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. कचरा संकलनाची सुध्दा बोंबाबोंब सुरूच आहे. नियमित कचरा उचलण्यासाठी भाजपच्याच नगरसदस्यांना पालिका प्रशासना विरोधात आंदोलन करावे लागते यापेक्षा दुसरे दुर्दैव काय? शहरातील सर्व रस्त्यांची खाजगी कंपनीच्या केबल्स टाकण्यासाठी चाळण करण्यात आली आहे. ऐन पावसाळ्यामध्ये रस्ते खोदल्याने रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हेच शहरवासीयांना समजत नाही. ऐन पावसाळ्यामध्ये डांबरीकरणाची मलमपट्टी सुरूच आहे. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना सत्ताधारी पदाधिका-यांचे. तर २०१७ पासून स्थापत्य, आरोग्य, विद्युत इत्यादी विभागाच्या निविदा या सत्ताधा-यांच्या बगलबच्चांनाच मिळाल्या आहेत. त्यामुळे कामांचा दर्जाच राहिलेला नाही असा आरोप कलाटे यांनी केला आहे.
उलट सत्तेचा उपभोग घेवून आता कोरोना काळात आयुक्तांवर गंभीर आरोप करुन प्रशासनाच्या कामावर गैरविश्वास दाखवत भाजप आमदारांनी आयुक्त व प्रशासना विरोधात मोहिम उघडण्याचा इशारा दिला आहे. हे म्हणजे स्वत:च मागील तीन वर्षात सत्ताधारी भाजपचे प्रशासनावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते व त्यामुळे शहराच्या विकासकामांचा खेळखंडोबा केल्याची सत्ताधाऱ्यांनी स्वतः कुबलीच दिली आहे. असे कलाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेे आहे.























Join Our Whatsapp Group