मावळ (Pclive7.com):- ४८ वर्षे होऊनही शेतकरी बांधवांना, धरणग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. याआधीचे सत्ताधारीही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. धरणासाठी अनेक गावे उठवावी लागली, असंख्य शेतकरी भूमीहीन झाले आहेत. पवना धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा जलपूजन करण्यासाठी येणार नाही, असा शब्द मावळचे आमदार सुनील शेळके यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिला.
मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या, कृषीक्रांतीसाठी वरदान ठरलेल्या पवना माईचे जलपूजन आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवनामाईला खणा नारळाची ओटी अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, कुसुम काशीकर, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजश्री राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, संत तुकाराम साखर कारखाना संचालक नरेंद्र ठाकर, ज्येष्ठ नेते महादु कालेकर, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, माजी सरपंच चंद्रकांत दहिभाते, संजय मोहोळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विशाल वहिले, तालुका सरचिटणीस सुदाम कदम, सरपंच सोमनाथ वाघोले, सागर घाडगे, माजी चेअरमन अनिल तुपे, नामदेव ठुले, माऊली निंबळे, बाळु आडकर, भीमराव मोहोळ व सर्व पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
साडे आठशे धरणग्रस्त शेतक-यांना अजूनही मोबदला मिळाला नाही. शेतक-यांना प्रामाणिक न्याय देणे हे आपले कर्तव्यच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली.
कोरोना सारखे महासंकट, चक्रवादळ या दोन्ही बाजूंनी संपूर्ण देशाला मोठा फटका बसला. सुरवातीला पाऊस काही काळ लाभला नाही. त्यामुळे धरणे भरतात की नाही, अशी चिंता लागून राहिली होती. मात्र, वरुणराजाच्या कृपेने मावळ तालुका तसेच पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.























Join Our Whatsapp Group