पिंपरी (Pclive7.com):- मालमत्ताकरांच्या बिलापोटी अनेक नागरिकांनी धनादेश महापालिकेकडे जमा केले आहेत. त्यातील काहींचे धनादेश न वटल्याने बँकेकडून परत आले आहेत. अशा नागरिकांनी १५ जूनपूर्वी संपूर्ण रक्कम भरावी. अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा कर संकलन व कर आकारणी विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सध्या ५ लाख ३९ हजार १७५ मालमत्तांची नोंदणी आहे. त्यात व्यावसायिक मालमत्तांची संख्या ४७ हजार ६१४ आहे. निवासी मालमत्तांमध्ये सुमारे ६ लाख ३५ हजार कुटूंब वास्तव्यास आहेत. त्यामध्ये वार्षिक सरासरी सहा टक्के वाढ होत असल्याचा जनगणनेचा निष्कर्ष आहे. त्याचा आधार घेता शहरात सध्या सुमारे ६ लाख १० हजार मालमत्ता अस्तित्वात असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
महापालिकेने महापालिकेने जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या कालावधीत विविध सवलत योजना राबवून थकीत मालमत्ताकर वसुली मोहीम राबवली होती. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी बिलापोटी धनादेश जमा केले. मात्र, त्यातील काही धनादेश वटले नाहीत. त्या नागरिकांनी १५ जूनपर्यंत संपूर्ण रक्कम जमा न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.