पिंपरी (Pclive7.com):- महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोकरी व्यतिरिक्त अन्य व्यवसाय व बेकायदेशीर कामकाजामध्ये सहभाग घेऊ नये, याची पुरेपुर दक्षता घ्यावी. अन्यथा वर्तणूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी संबंधिताविरुध्द नियमाधीन कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने विविध स्वरुपाचे आर्थिक व प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज सोपविले आहेत. त्यांचा अनेक नागरिक, ठेकेदार व इतर संस्थांशी संपर्क येतो. कामे करण्यासाठी विविध प्रलोभने व आर्थिक अमिषे दाखविले जातात किंवा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी ठरते. तसेच काही अधिकारी व कर्मचारी यांचेकडून महापालिकेच्या हद्दीत विविध स्वरुपाचे अनधिकृत बिगरपरवाना बांधकामे केलेली असू शकतात अथवा अतिक्रमणे करुन व्यवसाय केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
पर्यायाने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून बेकायदेशीर काम होवू शकते अशी शक्यता विचारात घेता, त्यांच्या अशा कृत्यामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन होवून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग होवू शकेल. त्यामुळे अशा स्वरुपाच्या गोष्टी भविष्यामध्ये घडणार नाही याची दक्षता कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी व कर्मचारी म्हणून प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
कायदा काय सांगतो..
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक नियम १९७९ मधील नियम १६ मधील तरतुदी नुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील कोणतोही व्यक्ती एखाद्या व्यापारात अथवा धंद्यात गुंतलेली असेल किंवा व्यवस्था पाहत असेल तर तो तसे शासनास कळविणे अशी स्पष्ट तरतुद आहे.
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे कुंटुबीय (पती/पत्नी/मुलगा/मुलगी) हे स्वत:चा व्यवसाय करीत असल्यास व असा व्यवसाय महापालिका कामकाजाशी निगडीत असल्यास सदरची बाब महापालिकेस वेळीच कळविणे आवश्यक राहील, जेणेकरुन महापालिका अधिकारी/कर्मचारी यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्याने महापालिका कामकाजात सहभाग दिसुन येणार नाही याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेणे आवयक आहे जेणेकरून वर्तणूक नियमाचा भंग होणार नाही.
आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश..
महापालिकेचा कोणताही अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य व्यवसाय करीत असल्यास त्याची माहिती महापालिकेस कळविणे बंधनकारक राहील.
ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी शासकिय व महापालिकेच्या राखीव जमिनी व मिळकतींवर अतिक्रमण करुन व्यवसाय उभारले असल्यास ते ताबडतोब स्वत:हून स्वखर्चाने काढुन घ्यावेत व तसे महापालिकेस तात्काळ अवगत करावे. तदनंतर असे बांधकाम/व्यवसाय झाल्याचे अथवा केल्याचे निर्दशनास आल्यास ते तात्काळ निष्कासीत करण्याची कार्यवाही करण्यात येवून संबंधिताविरुध्द शिस्त भंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.
कोणत्याही बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामे अथवा नियमबाहय कामामध्ये सहभाग नोंदवु नये याची पुरेपुर दक्षता घ्यावी. अन्यथा वर्तणूक नियमाचा व सदर परिपत्रकाचा भंग केल्याप्रकरणी सबंधिताविरुध्द कारवाई प्रस्तावित करणेत येईल.