पिंपरी (Pclive7.com):- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगरनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी सांगता समारंभ आणि वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संत तुकाराम नगर येथे सलग दुसऱ्या वर्षी दिंडी काढण्यात आली. दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ॲड मोरेश्वर शेडगे, अबोलीताई पिसाळ यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विशद करताना भक्त पुंडलिकाच्या आदर्शाचे स्मरण केले.”आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून पुंडलिकाच्या भक्तीमुळेच विठ्ठल युगानुयुगे विटेवर उभा आहे. प्रत्येकाने पुंडलिकाचा आदर्श आचरणात आणावा.”आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सण नसून भक्ती, सेवा, समता आणि संस्कारांचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. वारकरी संप्रदायाने समाजाला प्रेम, बंधुभाव आणि मानवतेची शिकवण दिली आहे. हीच शिकवण श्रमिकांपर्यंत पोहोचावी, श्रमिकांमध्ये ऐक्य निर्माण व्हावे आणि संतांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत जावा याच उद्देशाने दिंडीचे आयोजन केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

संत तुकाराम नगर पुतळा येथून दिंडीचे प्रस्थान होऊन मेहशानगर, संत तुकाराम नगर, वल्लभनगर, गंगानगर अशी तीन किलोमीटर दिंडी पायी चालून विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत तुकाराम नगर, श्री दत्त मंदिर, महेश नगर, हनुमान मंदिर मार्गे श्री गणेश मंदिर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर वल्लभ नगर, मारुती मंदिर आणि वल्लभ नगर वरून शनी मंदिर मार्गे आचार्य अत्रे रंगमंदिर येथे वारकरी कर्मचारी मेळाव्याने सांगता झाली.दिंडीमध्ये संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “जय जय राम कृष्ण हरी” या नामघोषांनी दुमदुमून गेला होता. टाळ-मृदंग, वीणा आणि अभंगांच्या सुरांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले होते. वारकरी पारंपरिक वेशभूषेत नृत्य करत, फुगड्या खेळत आणि अभंग गात पुढे जात असल्याने संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला होता.
दिंडीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो सुशोभित रथ. या रथामध्ये संतांच्या वेशभूषेत सजलेली लहान मुले विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांच्या रूपात विराजमान झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्वागत केले. अनेकांनी रांगोळ्या काढून वारकऱ्यांचे स्वागत केले.संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा जपत भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि श्रमिक ऐक्याचा संदेश देणारी ही दिंडी पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक संस्मरणीय सोहळा ठरली.

दिंडीचे संपूर्ण नियोजन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी स्वतः लक्ष घालून केले. संपूर्ण मार्गावर वारकऱ्यांच्या सुविधा, शिस्त, वाहतूक व्यवस्था, पाणी, वैद्यकीय मदत आणि सुरक्षिततेची काळजी घेत ते सतत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिंडीतील प्रत्येक घटक सुरळीत पार पडावा यासाठी त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांसह धावपळ केल्याचे दृश्य उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरले.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व, वारकरी परंपरेचे संस्कार, श्रमिकांचे समाजातील योगदान अधोरेखित केले. यशवंतभाऊ भोसले यांच्या सामाजिक, धार्मिक आणि श्रमिक चळवळीतील सातत्यपूर्ण कार्याचेही सर्व वक्त्यांनी मनापासून कौतुक केले.
दिनेश पाटील, दिपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे, ओमकार देशपांडे, ओंकार जोखारे, अप्पू नायर, अंकुश वाघमारे, मानसी देशपांडे, आरतीताई पराळे, इस्मात भाभी सय्यद, शालन महापुरे, संतोषी चौधरी, गणेश बुलदगड, विनायक निकम, श्रेयस करे, मल्लेश पोरवी, फौजदार गायकवाड, आप्पासाहेब माने, महेश भुते,सुधाकर शिंदे, सतीश सासवडे तसेच संत तुकाराम नगर सहकारी रचना मर्यादित सर्व कार्यकारणी व सभासद आदींनी दिंडी सोहळ्याचे संयोजन केले.
वारकरी श्रमिक मेळाव्याचे प्रास्ताविक कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी तर सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले.




















Join Our Whatsapp Group