राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
सांगवी (Pclive7.com):- नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत बदल करून प्रभाग क्रमांक ५ चर्होली या प्रभागातील अनुसूचित जमातीचे आरक्षण रद्द करून हे आरक्षण प्रभाग क्रमांक ४४ पिंपळे गुरव येथे टाकले आहे. परिणामी या प्रभागात असलेली खुल्या प्रवर्गातील एक जागा कमी झाली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत दुरुस्ती करून हे दोन प्रभाग पूर्ववत करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाला सादर केली. त्यानुसार प्रभागातील आरक्षणानुसार तीन सदस्य पद्धतीचे ४५ प्रभाग व एक प्रभाग चार सदस्यांचा असून, त्यानुसार निवडणुका होणार आहेत. नव्याने सादर केलेल्या प्रभाग रचनेनुसार नागरिकांच्या हरकतींचा विचार करून काही प्रमाणात जुन्या प्रभाग रचनेत बदल केला आहे.
शहरातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या विचारात घेता अनुसूचित जमातीसाठी बोपखेल, पिंपळे गुरव व चर्होली या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आले आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ४४ मध्ये खुला प्रवर्ग २ जागा, अनुसूचित जातीसाठी एक जागा अशी प्रभाग रचना करण्यात आली होती. तसेच प्रभाग क्रमांक ४१ मध्ये खुला प्रवर्ग एक जागा, अनुसूचित जाती एक जागा व अनुसूचित जमातीसाठी एक जागा अशा पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली होती.
मात्र, नागरिकांच्या हरकती व सुनावणी होऊन नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत बदल करून प्रभाग क्रमांक ५ चर्होली येथील अनुसूचित जमातीचे आरक्षण रद्द केले आहे आणि ते आरक्षण प्रभाग क्रमांक ४४ मध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४४ मधील खुल्या प्रवर्गाची एक जागा कमी झाली आहे. तरी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रभाग रचना दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.