पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव – नवी सांगवी परिसरातील अनेक समस्या जैसे थे अवस्थेत आहेत. महापालिका प्रशासनाला या समस्यांकडे पाहायला वेळ नाही. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना रखडलेल्या कमांकडे लक्ष देण्यास सांगितले.
अजित पवार नुकतेच पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. यावेळी राजेंद्र जगताप यांनी अजित पवार यांना निवेदन दिले. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राजेंद्र जगताप यांनी अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पिंपळे गुरव-नवी सांगवी परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेली कामे संथ गतीने सुरू आहेत. तसेच परिसरातील सर्वच कामे निकृष्ट दर्जाची आहेत. इंदौर पॅटर्न राबविण्यासाठी महापालिकेने कचराकुंड्या काढून टाकल्या आहेत. याचा विपरीत परिणाम रहिवाश्यांच्या आरोग्यावर होत आहे. घंटागाडीच्या वेळेत काही नागरिकांना कचरा टाकता येत नाही. असे नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असून, ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरच कचरा असल्याने मोकाट कुत्री व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करीत आहेत. त्यामुळे हा कचरा ड्रेनेज लाईनमध्ये अडकून पावसाचे पाणी रहिवास्यांच्या घरात जात आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या निवेदनाची दखल घेत अजित पवार यांनी पिंपळे गुरवमधील या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या.