पिंपरी (प्रतिनिधी):- असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात माथाडी कामगारांच्या पगारवाढीचा ‘लेव्ही’सह ३९ टक्के करार झाला. हा करार १ सप्टेंबर २०१७ पासून लागू झाला असून कराराची मुदत तीन वर्ष आहे. या करारामुळे कामगारांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पिंपरी चिंचवड बोर्डातील सर्व कामगारांना याचा फायदा होणार आहे. भरघोस बोनस मिळाल्यानंतर झालेला करार म्हणजे कामगारांसाठी दिवाळीचे मोठे ‘गिफ्ट’ ठरले आहे. यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यामधील जुना करार ३१ ऑगस्ट २०१७ रोजी संपला होता. त्यानंतर नवीन करार करुन असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे यांनी माथाडी कामगारांच्या वेतनात भरीव वाढ केली आहे. निगडी येथील असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात आज (गुरुवारी) झालेल्या कार्यक्रमात असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टच्या वतीने अध्यक्ष बाबा धुमाळ, कार्याध्यक्ष के.सी.शर्मा, के.पी.सिंग, आर.के. गुप्ता, प्रमोद भावसर आणि महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद आणि पदाधिका-यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या. करारावर स्वाक्ष-या होताच कामगारांनी गुलालाची उधळण करत कराराचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, भिवाजी वाटेकर, पांडुरंग कदम, मुरलीधर कदम, प्रवीण जाधव, खंडू गवळी, सतीश कंठाळे, ज्ञानेश्वर मुजुमले, अशोक साळुंखे, गोरक्ष दुबाले, राजेंद्र तापकीर, नागेश वनवटे, सर्जेराव कचरे, मारुती कौधरी, हनुमंत शिंदे, जोगेंदर शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबा धुमाळ म्हणाले, ट्रान्सपोर्ट आणि माथाडी कामगार देशाचा कणा आहे. माथाडी कामगार आणि वाहतूक जिवंत राहिली तरच देश चालणार आहे. महाराष्ट्र मजदूर संघटना शिवसेनेशी संलग्न आहे. याचा मला मोठा अभिमान आहे. संघटनेला आणि माथाडी कामगारांना मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. इरफान सय्यद कामगारांच्या हिताचे कार्य करत आहेत.
महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, “या वेतनवाढ कराराचा पिंपरी-चिंचवड बोर्डातील सर्व कामगारांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. माथाडी कामगार हा कष्टाचे काम करतो. गेल्या अनेक वर्षांतील हा सर्वांत मोठा वेतनवाढ करार आहे. औद्योगिक शांतता जपत आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा वेतनवाढ करार संपन्न झाला. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. दोन आठवड्यात हा करार झाला आहे. त्याबाबत संघटनेच्या वतीने ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा मी आभारी आहे. कराराची प्रत औद्योगिक कंपन्यांना देण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे”
माथाडी कामगार कंपनीत माल देण्यासाठी गेल्यास कंपनी मालकांकडून पैसे घेत नाहीत. बोर्डात पैसे जमा झाल्यानंतर माथाडी कामगारांना पैसे मिळतात. माथाडी कामगार इमानदारीने काम करत आहेत असे सांगत सय्यद पुढे म्हणाले की, सध्या बाजारात बोगस संघटनामध्ये वाढ होत आहे. बोगस संघटनांना वेळीच चाप लावणे गरजेचे आहे. बोगस संघटनाच्या विरोधात पोलिसात तक्रार केली पाहिजे. बोगस संघटनांविरोधात गुन्हे दाखल केले पाहिजेत. बोगस संघटनांमुळे चांगले काम करणा-या संघटनांची नाहक बदनामी होत आहे. कोणत्याही संघटनेला कायदा अमंलबजावणीचे पत्र व्यवस्थापनाला देण्याचे अधिकार नाहीत. तरीदेखील काही बोगस संघटना सर्रासपणे हे पत्र व्यवस्थापनाला पाठवत आहेत. अशा संघटनांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही सय्यद म्हणाले. पिंपरी चिंचवड माथाडी मंडळाचे चेअरमन बाळासाहेब वाघ, सचिव रुमाले साहेब, निरीक्षक विजय सावंत, लेखापाल संजय जोशी व इतर कर्मचा-यांचे देखील सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रंसचालन सर्जेराव कचरे यांनी केले.