मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रम आज मुंबईमध्ये पार पडला. या कार्यक्रमात सर्वच प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक जुण्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरद पवार म्हणाले कि, ‘महाराष्ट्राचा उद्योगमंत्री असताना एका दिवशी दत्तात्रय वळसे-पाटील अर्थात दिलीप वळसे-पाटील यांच्या वडिलांसोबत भीमाशंकरला गेलो होतो. त्या दिवशी रात्री राहण्याची सोय केलेल्या एका खोलीत झोपलो असता रात्री एकच्या सुमारास अचानक हालचाल जाणवली. त्यामुळे उठून बघितल तर एक साप अंगावरून सरपटत बाहेर निघून गेला होता. दत्तात्रय पाटील यांना हाक मारली आणि घडलेला प्रकार सांगितला’.
‘मी सांगितलेली गोष्ठ ऐकून दत्तात्रय पाटील यांना उलट आनंदाने उकळ्या फुटल्या. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे पूजा करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे आम्ही पूजा करून मुंबईला आलो. त्याच दिवशी विधानसभेत वेगळ्या घडामोडी घडल्या त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर पुढील आठच दिवसांत मुख्यमंत्री झालो. दिलीप वळसे-पाटील यांच्या वडिलांनी सांगितलेला शुभशकुन मी प्रत्यक्षात अनुभवला. त्यानंतर माझी पत्नी सातत्याने भीमाशंकरला जाते’. शरद पवारांनी हि आठवण सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडात झाला.