पिंपरी (Pclive7.com):- हर्षद पिंगळे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस योग्य ते शासन मिळण्याबाबत व अशा चालकांकडून होणार्या त्रासास आळा बसण्याबाबत इंडो ॲथलेटिक्स सोसायटीकडून पौड पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले. सुरक्षित व समान हक्क मिळण्यासाठी आयएएसतर्फे आंदोलन करण्यात आले.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/08/1000x500-px-PMC-Live-01-300x150.jpg)
यावेळी गणेश भुजबळ, अजीत पाटील, गिरिराज उमरीकर, अजित गोरे, अमित पवार, मदन शिंदे, विजय गायकवाड, संतोष नखाते, प्रदीप टाके, हरिप्रिया, दीपक बुरकुल, श्रीकांत चौधरी, अभय खटावकर, शैलेश पाटील, संदीप परदेशी, रमेश पवार, विवेक कडु, अंजली खटावकर, केशव, निलेश टकले, स्मिता गाबादे, संदीप गायकवाड व स्काय मानस लेक सोसायटी सभासद यांनी पुणे विद्यापीठ ते पौड पोलीस स्टेशन सायकल मार्च चे नेतृत्व केले. शहरातील ५०० सायकलिस्ट धावपटू असे सहभागी होते. यावेळी पिंगळे कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230821-WA0004-300x225.jpg)
बुधवार दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी हर्षद पिंगळे हे नेहमी प्रमाणे स्वतः च्या शरीरस्वास्थासाठी पळण्याचा सराव करीत असताना त्यांना भूगाव दरम्यान अनोळखी वाहन धडक देवून निघून गेले. यात हर्षद पिंगळे गंभीर जखमी झाले व त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230724-WA0002-300x200.jpg)
या व अशा अनेक घटना सध्या सर्रास घडत आहेत. अशा प्रवृत्तींना आळा बसणे व संबधित वाहन चालकास योग्य ती शिक्षा होऊन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून पोलिसांकडून उत्तेजक द्रव्य तपासणी, नियमबाह्य़ चालक तपासणी अशा गोष्टी सुरू करण्यासाठी हा अर्ज आम्ही सादर केला असे आयएएसचे संस्थापक सदस्य अजित पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.
महानगरांमध्ये आजकाल सर्रास असे प्रकार घडत आहेत. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात सायकल स्वार व रनरची संख्या वाढली आहे. परंतु त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत नाही. त्यांच्यासाठी सुरक्षित असे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. एका बाजूला आपण प्रदूषण मुक्त शहरांचे स्वप्न पाहत आहोत. परंतु सायकल फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर बाबत कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात येत नाही असे आयएएसचे संस्थापक सदस्य गणेश भुजबळ यांच्यातर्फे सांगण्यात आले.
मागील वर्षामध्ये अशाप्रकारे रस्त्यावर पाच ते दहा व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. हर्षद पिंगळे अतिशय सुस्वाभावी व मनमिळावू अभियंता होता. त्यांच्या डोक्याला इजा होऊन देखील त्यांच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी टाळाटाळ होत आहे. खरे कारण लवकरात लवकर पुढे यावे आणि दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी. सर्वांच्या न्याय हक्कासाठी आयएएस संघटनेतर्फे रस्त्यावर उतरण्यात येईल.
शहरामध्ये व हायवेवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे चालू आहेत. त्यावर आत्ताच ॲथलेट लोकांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध व्हावेत अशी मागणी महापालिकेकडे वेळोवेळी करण्यात आली आहे. परंतु या मागणीकडे कोणत्याही प्रकारचे दखल घेतली जात नाही. त्यामुळे यापुढे राज्य सरकारला व केंद्रीय समितीला देखील या संदर्भात निवेदन संस्थेतर्फे करण्यात येईल असे इंडो ॲथलेटिक्सच्या वतीने सांगण्यात आले.
Tags: इंडो ॲथलेटिक्स सोसायटी