पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरवासियांना दुषित पाणीपुरवठा करणाऱ्यांवर व पवनामाई दुषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/08/1000x500-px-PMC-Live-01-300x150.jpg)
नाना काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीतील थेरगाव येथील केजूदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर आज (दि.२१) सकाळी मोठ्या प्रमाणात पांढरा फेस दिसून आला. काही कंपन्या व उद्योगाचे रासायनिक सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपात्रात मिसळत आहे. तसेच, अनेक नाले थेट नदीत मिसळत आहेत. या कारणांमुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी वरदायनी असणाऱ्या पवनामाई नदीची दुरावस्था झाली आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230724-WA0003-300x284.jpg)
असे असताना आपल्या महापालिका पर्यावरण विभाग दिखाव्यासाठी नाममात्र कारवाई करतात. मात्र संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी पवनामाई प्रदूषित करणाऱ्यावर कडक कारवाई कधी करणार? की दुषित पाणी पिल्याने नागरिक दगवायची किंवा मोठी घटना घडण्याची वाट बघत आहे का? महापालिका आयुक्तांनी शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्याचे पाप माथी घेऊ नये, मागील जुलै महिन्यात १६ जुलै २०२३ रोजी पवना नदी पात्रता असाच फेस आला होता. त्यावेळी काही लॉंड्री व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. नदी प्रदूषणात व्यवसाय करणाऱ्या बरोबर पावसाच्या वाहते पाणी, जलपर्णी, माती, कचरा, राडारोडा घाण मिसळते आणि पाणी दुषित होते. याशिवाय घराच्या छोट्या कारणाने पाणी प्रदूषित होतच असते. नदीनाल्यात वाहने धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची वेस्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं. केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे, ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडणे असे अनेक प्रकार वारंवार होताना दिसत आहेत.
शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महापालिकेने पुढाकार घेत दोन्ही नद्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी अपेक्षित उपाययोजनांची गरज आहे. नदीपात्रामध्ये मिसळणारे सांडपाणी, बांधकामाचा राडारोडा टाकून केले जाणारे अनधिकृत भराव व त्यामुळे अरुंद होणारे नदीपात्र यामुळे नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन तातडीने करावयास हवे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प गेली नऊ वर्ष रखडलेल्या अवस्थेत आहे. केवळ पवना व इंद्रायणी नदी सुधारसाठी कोट्यावधी रुपये निधीची तरतूद कागदावर न करता तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.