रहाटणी येथील आनंद बुध्द विहारात जयंतीचा उत्साह
पिंपरी (Pclive7.com):- देशातील काही राजकीय पक्ष आणि राजकारणी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी अफवा पसरवून धूर्त राजकारण करत आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना भाजप सरकार बदलणार असल्याची अशीच एक खोटी अफवा सध्या पसरवून समाजबांधवांची दिशाभूल करण्याची आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे.
रहाटणी येथील आनंद बुद्ध विहार येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष शंकर जगताप बोलत होते. त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष महादेव कांबळे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेविका सविता खुळे, भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष भीमा बोबडे, आयुष्यमान भारत समितीचे शहराध्यक्ष गोपाळ माळेकर, यांच्यासह आनंद बुद्ध विहाराचे पदाधिकारी, सभासद आणि उपासक-उपासिका आणि रहाटणी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले की, या बुद्ध विहारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो वा बौद्ध पौर्णिमा स्व. लक्ष्मणभाऊ दरवर्षी आवर्जून येत असत. अगदी आजारपणातही त्यांनी हा पायंडा मोडला नाही. त्यांचा हाच पायंडा मीदेखील पुढे अविरत सुरू ठेवणार असून यापुढे मीदेखील दरवर्षी या विहाराला भेट देणार असल्याची ग्वाही, शंकर जगताप यांनी यावेळी दिली.