
पिंपरी (Pclive7.com):- कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभा खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांना पुणे ते कोकण रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत मागणीपत्र सादर केले.

मागणीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच पुणे जिल्ह्यातील कोकणवासीयांसाठी पुणे ते कोकण रेल्वे सेवा अत्यंत गरजेची आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रहिवासी पुण्यात स्थायिक असून, सण-उत्सव, पर्यटन आणि कौटुंबिक कारणांसाठी वारंवार कोकणात प्रवास करतात. सध्या या प्रवासासाठी एस.टी. बसचा वापर करावा लागतो, ज्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढतात.

रेल्वे सेवा सुरू झाल्यास कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर पुणे ते कोकण रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी महासंघाने केली.

या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळ, दापोली मंडणगड सेवाभावी संस्था, महाड पोलादपूर समाज सेवा संघ, सह्याद्री कुणबी संघ कोकण मित्र मंडळ, कोकण भूषण मित्र मंडळ, सिद्धिविनायक प्रतिष्ठान, कोकण खेड युवाशक्ती, कारवार कोकण मराठा समाज, कुंभार कोकणस्थ समाज संस्था, सातेरी देवी मंदिर मंडळ, सिंधुदुर्ग एकता प्रतिष्ठाण, कोकण नव विकास मंडळ, पंधरा गाव विकास संस्था, संबंधित मराठा कोकण समाज, समस्त धनगर समाज पोलादपूर समाज सेवा संघ, कुणबी समाज समिती आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group