पिंपरी (Pclive7.com):- बारामती ही माझी जन्मभूमी असली तरी पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे. मी अनेकांना पदे दिली. मात्र काहींनी पदे दिल्याचे भान ठेवले नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केली. माणुसकी सोडलेल्या या मंडळींना घरी बसवा असे आवाहन त्यांनी केले.
पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ पिंपरी गावात आयोजित जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम,शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, गिरीजा कुदळे, पीसीएमटी चे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक नाना काटे, राम आधार धारिया, श्रीरंग शिंदे, विजय कापसे, शांती सेन, विजय लोखंडे आगमनवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील श्रीमंत महापालिका होती. मात्र या महापालिकेला 2017 नंतर सत्तेत आलेल्यांनी कर्जबाजारी केले. आठ हजार कोटीच्या ठेवी मोडल्या कर्जरोखे काढले. 40000 कोटीची कामे झाली म्हणतात पण दिसत नाही.
पुणे मुंबई महामार्ग रावेत येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहन पार्किंग करण्यासाठी लोकांना जागा उपलब्ध नाही याला कारण पालिकेत आता जे सत्तेत होते त्यांच्याकडे व्हिजनच नाही. त्यांचे लक्ष फक्त टेंडर मध्ये रिंग करणे दादागिरी यावरच आहे. काही लोकांच्या मालमत्ता कशा वाढल्या, ते पहा तुमच्या लक्षात येईल. कुत्र्यांच्या नसबंदीतही यांनी पैसे खाल्ले. प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार केला. लँड माफिया असतात तसे आता खोदाई माफी या सुद्धा निर्माण झाले आहेत. प्रारूप विकास आराखड्यावर पन्नास हजार हरकती आल्या आहेत. आळंदी लगत कत्तलखाना प्रस्तावित केला. यांच्याकडे व्हिजन नाही अशी टीका पवार यांनी केली.

यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी संजोग वाघेरे यांचे नाव न घेता टीका केली. काही मंडळी कोण संदीप वाघेरे असे विचारतात. मात्र जनतेने मला निवडून दिले तेव्हापासून मी अनेक विकास कामे केली. त्यामुळे मी टीमकी नाही. ढोल वाजवतो असे ते म्हणाले. काहींनी सरड्याप्रमाणे रंग बदलले. पालिकेच्या ठेक्यांवर जगणारी ही पिल्लावळ घरी बसवा असे आवाहन त्यांनी केले. त्याचा उल्लेख करून अजित पवार म्हणाले की, संदीप वाघेरे यांच्यासारखी स्वखर्चाने कामे करणारी माणसे आजकाल दिसत नाहीत. संदीप वाघेरे यांनी काही मंडळींचा सरड्याप्रमाणे रंग बदलणारे असा उल्लेख केला. आता ते रंग बदललेले तुमच्याकडे येतील. पाय धरतील पण त्यांना घरी बसवा असे आवाहन पवार यांनी केले.
























Join Our Whatsapp Group