मुंबई (Pclive7.com):- राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, वीज भारनियमन, पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाईची झळ याविरोधात राष्ट्रवादी पक्ष मैदानात उतरला आहे. आजपासून १५ ते २० ऑक्टोबरला म्हणजे आठवडाभर राज्यभर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत. शिवाय या मोर्चाने सरकारला जाग आली नाही, तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.
केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप-शिवसेना सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने आठवडाभर तहसिल आणि उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत. या निषेध मोर्चाने सरकारला जाग आली नाही, तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्यांना घेराव घालून जाब विचारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पेट्रोल-डिझेलची दरवाढ, अनियमित वीजपुरवठा, वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि राज्यात भाजपप्रणित उद्भवलेला गंभीर दुष्काळ यामुळे सर्वसामान्य जनता पुरती हैराण झाली आहे. मात्र हे सरकार या गोष्टीवर अद्याप गंभीर नाही. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात उतरल्याचेही सांगण्यात येत आहे. १५ ते २० ऑक्टोबरला निषेध मोर्चे काढतानाच उपविभागीय अधिकारी किंवा तहसिलदारांना या समस्यांचे निवेदनही दिले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.