महापालिका आयुक्त व नगरसचिवांना दिले पत्र
पिंपरी (Pclive7.com):- काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांच्या मुला-मुलीचे शिक्षण, त्याच्या आई-वडीलांचे आजारपण आणि त्यांच्या कुटूंबियांना मदत व्हावी, याकरिता १ मार्च २०१९ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत या कालावधीतील आपले नगरसेवकपदाचे दरमहा असलेले १५ हजार रुपये मानधन हे केंद्र सरकारच्या संरक्षण सहाय्यता निधीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे देणार आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नगरसचिव उल्हास जगताप यांना पत्र दिले आहे. जम्मु-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभर संताप व्यक्त होत आहे. या आधीही दहशतवाद्यांनी कारगिल, पठाणकोट आणि उरी याठिकाणी केलेल्या चकमकीमध्ये भारतीय जवान शहीद झाले आहेत. या घटना घडल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळते. बंद पुकारले जातात, कँडल मार्च काढले जातात. शहीद जवानांच्या कुटूंबाबाबत संवेदना जाहीर करुन आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले जाते.
केंद्राकडून व राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. तथापि, ती पुरेशी नसते. तसेच त्या कुटुंबातील कर्तामाणूस गेल्यानंतर आर्थिकदृष्टया ते कुटुंब अडचणीत येते. काही दिवसांनी आपण त्या कुटूंबाला विसरुन जातो. दोन पाच वर्षांनी त्या शहीदांच्या कुटुंबियांची काय अवस्था आहे याची जाणीव आपणाला राहत नाही. अनेकदा शहीदांच्या कुटुंबियांना फार मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागते. त्यांच्या मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचे आजारपण इत्यादी गोष्टींना त्यांना पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यावेळी आपल्या जाणीव बोथट झालेल्या असतात.
देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना थोडीफार आर्थिक मदत व्हावी. सामाजिक बांधिलकी जोपासत मी १ मार्च २०१९ पासून ते माझ्या नगरसेवकपदाचा कालावधी फेब्रुवारी २०२२ पर्यंतचे मानधन केंद्र सरकारच्या संरक्षण सहाय्यता निधीस ( नॅशनल डिफेन्स फंड) देण्यात यावे, असे कलाटे यांनी पत्रात म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group