पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांकडील नागरी सेवा, सुविधांबाबतची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक संगणकीकृत सारथी हेल्पलाईन (कॉल सेंटर) सेवा दि.१५ ऑगस्ट २०१३ रोजी सुरू करण्यात आले आहे. या ‘सारथी’ हेल्पलाईन दूरध्वनी सेवा २४ तास आठवड्यातील सातही दिवस नागरीकांसाठी उपलब्ध असून त्याद्वारे नागरिकांना आवश्यक असलेली माहिती फोनवरून उपलब्ध करून देण्यात येते. या हेल्पलाईनवर दि.१५ ऑगस्ट २०१३ ते दि. १३ जानेवारी २०२० अखेर एकूण १५,०१,९४५ नागरिकांनी संपर्क साधून माहिती व त्यांचे तक्रारींचे निराकरण करण्याबाबत सेवेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकूण ६,९१,६१३ नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरून सारथी वेबलिंकद्वारे माहिती प्राप्त करून सदर सेवेचा लाभ घेतल्याने ही हेल्पलाईन अत्यंत यशस्वी ठरली आहे.
सारथी हेल्पलाईन, सामान्य नागरिकांना त्यांचे दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने महापालिकेच्या सेवांव्यतिरिक्त नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडील विविध सेवा, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड, मतदार नोंदणी इत्यादी सेवा व एम.आय.डी.सी., प्राधिकरण, महावितरण, आर.टी.ओ., इत्यादी विविध विभागांकडील सेवांबाबतची माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून कामकाजानिमित्त येणाऱ्या बहुभाषिक नागरिकांच्या सोईसाठी सारथीद्वारे उपलब्ध असलेल्या सर्व सेवांची माहिती, सारथी पुस्तिका, वेबलिंक, मोबाईल अँप्लिकेशन, ई-बुक इत्यादी मराठी भाषेबरोबरच इंग्रजी व हिंदी भाषांमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या योजनेचा लाभ एकूण ११,२५,२१९ नागरिकांनी घेतला आहे.
“सारथी” हेल्पलाईन दूरध्वनी व वेबलिंक सेवेचा प्राप्त गोषवारा
(दि. १५ ऑगस्ट २०१३ ते दि. १३ जानेवारी २०२०)
अ.क्र माहितीची साधने लाभार्थींची संख्या
१ संकेतस्थळ व वेब लिंक ६,९१,५१३
२ हेल्पलाईन ३,७६,७२६
३ पी.डी.एफ. पुस्तिका २,७७,६२४
४ ई-बुक १,२२,१६४
५ मोबाईल अँप्लिकेशन २५८४३
६ छापील पुस्तिका ८,०७५
एकूण १५,०१,९४५
दि. १३ जानेवारी २०२० अखेर सारथी हेल्पलाईन येथे विविध विभागांशी संबंधित एकूण १,६५,७५९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १,६०,७८७ तक्रारींचे निराकरण झाले असुन तक्रारी निराकरण करण्याची टक्केवारी ९७ टक्के इतकी आहे. सदर सेवा व तक्रारींच्या निराकरणाबाबत विविध नागरिकांनी हेल्पलाईनमध्ये दूरध्वनीद्वारे समाधान व्यक्त केले आहे. ‘सारथी’ या महत्वाकांक्षी प्रकल्पास राज्य शासनाकडील राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा अंतर्गत १० लाख प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा सुनियोजित उपयोग करून नागरी सुविधा देणेबाबत महाराष्ट्र राज्यशासनाचा सन २०१२-२०१३ करिता सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. सारथी उपक्रम सुरू झाल्यापासून मागील ६ वर्षात राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांनी सारथीला भेट दिली आहे.