मुंबई (Pclive7.com):- सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. मुंबई तसेच महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचे शरद पवार यांनी यावेळी म्हटले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितलं की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत”.
“एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होते. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत आहे. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेतली नाही याचं आश्चर्य वाटलं,” अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
“महाराष्ट्र तसेच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असे वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे,” असे शरद पवार यांनी सांगितले.
























Join Our Whatsapp Group