पिंपरी (Pclive7.com):- वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदा आषाढीवारी पालखी सोहळ्यात हरित वारी, निर्मल वारी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पंढरपूर येथील पिराची कुरोली, भंडी शेगाव आणि वाखरी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना देशी वृक्षांच्या बियांची पाकिटे भेट देऊन करण्यात आली.
महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उद्यान विभागाचे विभागप्रमुख रविकिरण घोडके, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे व इतर अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे जगद्गुरु संत श्री. तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दिनांक ११ व १२ जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार आहे. यावर्षी जनमाणसांत पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हरित वारी, निर्मल वारी हा संदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार असून त्याअंतर्गत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणा-या वारकऱ्यांना महानगरपालिकेच्या वतीने साग, रक्तचंदन, बहावा, अर्जुन, करंज, जांभुळ, आंबा, चिंच, विलायती चिंच, गुलमोहर इ. प्रकारच्या वृक्षांच्या १ लाख बियांच्या ५ हजार कागदी पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या बियांची लागवड आम्ही आमच्या गावात करणार असून या देशी वृक्षांमुळे जमिनीची होणारी धूप रोखण्यास मदत होईल असा विश्वास उपस्थित ग्रामपंचायत प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केला. देशी वृक्षांच्या लागवडीचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक फायदे असून देशी वृक्षांची लागवड व संरक्षण ही काळाची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देशी वृक्षांच्या बियाणांचे वाटप करण्याच्या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. या बियांमुळे वारक-र्यांच्या माध्यामतून खऱ्या अर्थाने पांडुरंगाची ही वारी हरित वारी, निर्मल वारी होणे शक्य होणार असल्याचे मत यावेळी उपस्थित ग्रामपंचायत प्रतिनिधींनी व्यक्त केले.