पिंपरी (Pclive7.com):- भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणाला रामराम ठोकला आहे. राजकारणात आता मन रमत नाही, असं सांगत त्यांनी राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं आहे. X या समाजमाध्यमातून याबाबतची पोस्ट करून दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे.
निलेश राणे यांनी X पोस्टवर म्हटलंय की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम मिळालं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे.
“मी एक लहान माणूस आहे, पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील, पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कुडाळ तालुक्यातील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची उमेदवारी जाहीरच करून टाकली होते. ‘कुडाळचे पुढचे आमदार निलेश राणे असतील. तुम्ही त्यांना साथ द्या’, असे थेट आवाहन त्यांनी उपस्थितांना केले होते. या निवडणुकीमुळे निलेश राणे यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याचीही चर्चा होती. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पुन्हा एकवार राणेंची पकड मजबूत झाली असती. परंतु, त्याआधीच निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.