मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये अखेर समिती बरखास्त होऊन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणात आमदार सुनील शेळके यांची मोठी राजकीय खेळी यशस्वी ठरल्याची चर्चा रंगली आहे. तीन वर्षांपूर्वी मोठ्या खर्चात निवडून आलेल्या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट बहुमतासह सत्ता होती. सभापतीपदी संभाजी शिंदे तर उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची नियुक्ती झाली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे इतर संचालकांना संधी न देता या दोघांनी तीन वर्ष पदे न सोडल्याने असंतोष वाढत गेला.

या पार्श्वभूमीवर असंतुष्ट संचालकांनी एकत्र येत अविश्वास ठरावाची तयारी केली. त्याची चाहूल लागताच सभापती व उपसभापतींनी राजीनामे दिले. त्यानंतर नव्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही अंतर्गत फुटीरतेमुळे भाजपला सभापतीपद पटकावण्यात यश आले. मात्र हा विजय काही तासांपुरताच ठरला. या घडामोडींची गंभीर दखल घेत आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे व तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी राष्ट्रवादीच्या संचालकांची तातडीची बैठक घेऊन सर्वांना राजीनाम्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या १३ पैकी ९ संचालकांनी तत्काळ राजीनामे सादर केले, तर उर्वरित ४ जणांनी दुसऱ्या दिवशी राजीनामे दिले. त्यामुळे समितीतील बहुतांश संचालक बाहेर पडल्याने बाजार समिती बरखास्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. या घडामोडींमुळे भाजपचे सभापतीपदाचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच भंगले. दरम्यान, संचालक मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे समितीचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आणि पहिली बैठकही कोरम अभावी फक्त चर्चेपुरतीच मर्यादित राहिली.
यानंतर संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सहाय्यक निबंधकांकडून जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 अंतर्गत कलम 45(1) नुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) श्री. प्रकाश जगताप यांनी आदेश काढत तळेगाव दाभाडे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मावळ, जि. पुणे श्री. नवनाथ अनपट यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आता समितीचे सर्व अधिकार त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

दरम्यान, मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही संचालकांनी भाजपला साथ देत मतदान केले होते. मात्र या निर्णयामुळे त्यांनाही मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले व नंतर भाजपमध्ये गेलेले श्री. सुभाष जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादीचे काही संचालक फोडून सभापतीपद मिळवले होते. परंतु आमदार सुनील शेळके यांच्या निर्णायक राजकीय खेळीमुळे त्यांचे हे स्वप्न काही तासांतच भंगले. एकंदर, पक्षांतर्गत असंतोष, फुटीरता आणि त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी घेतलेला कठोर निर्णय यामुळे संपूर्ण समीकरण बदलले. अखेर बाजार समिती बरखास्त होऊन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून, मावळ तालुक्यात आमदार शेळके यांच्या या मोठ्या राजकीय खेळीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.




















Join Our Whatsapp Group