मुंबई (Pclive7.com):- राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकासआघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मविआच्या बंदवरुन मुंबई हायकोर्टाचे सरकारला दिले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवार यांनी म्हटले आहे की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (२४ ऑगस्ट) राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.
महाविकास आघाडी यांनी महाराष्ट्र बंदच आवाहन केलं होतं. मात्र शरद पवार यांनी न्यायालयाचा मान राखत महाराष्ट्र बंद मागे घेण्याचा आवाहन केले आहे. सध्या तरी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र बंद वर ठाम असून उद्धव ठाकरे सुद्धा या सगळ्या संदर्भात थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. उद्याचा बंद हा कुठल्याही राजकीय पक्षाचा बंद नाही. बदलापूरच्या घटनेविरोधातला रोष म्हणून हा बंद आहे, अशी भूमिका महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आहे.






















Join Our Whatsapp Group