मुंबई (Pclive7.com):- ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भारत कुमार’ म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं शुक्रवारी, 4 एप्रिल 2025 रोजी निधन झालं. मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये ‘भारत कुमार’ म्हणून ओळख मिळाली.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मधे दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मुख्य भूमिका असलेला त्यांचा पहिला चित्रपट राजा खोसला यांचा 1964 मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ सुपरहिट ठरला. या चित्रपटातील ‘लग जा गले’ आणि ‘नैना बरसे रिमझिम’ ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती.
























Join Our Whatsapp Group