पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बर्ड व्हॅलीसारखे शहरातील उत्कृष्ट असे पर्यटन केंद्र विकसित केलेले आहे. परंतु, हे पर्यटन केंद्र गुन्हेगारीशी संबधित घटना व दैनंदिन होणा-या गैरप्रकारांमुळे बदनाम होत आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागाच्या अध्यक्षा व नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी म्हटले आहे. तसेच, हे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिस यंत्रणेने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये टेल्को रस्त्यालगत बर्डव्हॅली उद्यान आहे. या उद्यानातील खाणीच्या या तलावात मागील आठवड्यात एका २५ वर्षीय तरुणाचा मृतेदह आढळून आला होता. यापूर्वी अनेक वेळा या उद्यानात उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वारंवार अशा घटना घडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा फटका महापालिकेला बसत असल्याने अनुराधा गोरखे यांनी बर्ड व्हॅली उद्यानाकडे प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
या संदर्भात अनुराधा गोरखे म्हणाल्या की, जुन्या खाणीचा योग्य वापर करून कोट्यवधी रुपये त्यावर खर्चून महापालिकेने हे उद्यान विकसित केले. या भागाचे सौदर्य फुलविणारे व आकर्षक असे हे पर्यंटन स्थळ म्हणून नावारुपाला आले. तेथे पिंपरी चिंचवड शहराबरोबर पुणे व इतर ठिकाणाहूनही लोक आवर्जून भेट देण्यासाठी येतात. मात्र, तेथे घडणा-या अप्रिय घटनांमुळे हे पर्यटन स्थळ बदनाम होऊ लागले आहे. सतत या परिसरात आत्महत्या, खून, मारामाऱ्या सारख्या घटना घडतात. या उद्यानात येणा-या तरुण-तरुणींकडून गैरप्रकार केले जातात. या गैरप्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह नागरिक बर्डव्हॅली उद्यानात जाणे टाळतात. ही बाब महापालिका व पर्यटनस्थळाच्या दृष्टीने योग्य नाही.
या ठिकाणी सुरक्षाविषयक आवश्यक काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आत्महत्या सारख्या घटना वारंवार घडतात. उद्यानातील साधनांची दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी महापालिकेमार्फत देखभाल दुरुस्ती, सुरक्षेचे काम ठेकेदारांना दिलेले आहे. मात्र, हे ठेकेदार देखभाल व दुरुस्तीचे काम पैसे घेऊनही नीट करत नाही. त्यांच्याकडून उद्यानाकडे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानाची बिकट परिस्थिती झाली आहे. योग्य कामे केली जात नसून उलट येणा-या पर्यटकांना येथील ठेकेदारी कर्मचा-यांकडून अरेरावी केली जाते. उद्यानातील सुविधा व उपायोजनांबाबत सुधारणा होणे गरजेचे आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी अनुराधा गोरखे यांनी केली आहे.