मावळ (Pclive7.com):- शुक्रवारी कामगार दिनाच्या सुट्टीत फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण (नवलाख उंबरे) आणि साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून एकूण चार तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाधववाडी धरणात तिघांचा मृत्यू..
जाधववाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांपैकी अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने एकूण पाच जण बुडाले. त्यापैकी दोघांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या तरुणांना बाहेर काढून सीपीआर देण्यात आला, परंतु बराच वेळ उलटल्यामुळे त्यांना वाचवण्यात अपयश आले.

पवना नदीत एकाचा मृत्यू
दुसरी घटना साळुंब्रे येथील जुन्या दगडी पुलाजवळ घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा तरुण सकाळी सुमारे ८ वाजता नदीत पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याची खोली न समजल्याने तो बुडाला. मनोज हा स्थानिक काळोखे पाईप लाईन कंपनीत काम करत होता.

रेस्क्यू ऑपरेशन आणि मदतकार्य
घटनेनंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा तळेगाव दाभाडे अग्निशामक दल आणि NDRF च्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले.
जाधववाडी येथील तिघांना ‘विरा ॲम्बुलन्स’च्या मदतीने जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे नेण्यात आले, तर साळुंब्रे येथील तरुणाला पुढील तपासणीसाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

रेस्क्यू टीमचे योगदान
या मोहिमेत निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, कमल परदेशी, शुभम काकडे, विकास दोड्डी, भारत मेहेंदळे, अनिश गराडे .कमलेश राक्षे, सर्जेस पाटील, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, रवी कोळी, कुंदन भोसले, हर्षद काळोखे, राजू सय्यद, करण भांगरे तसेच विरा ॲम्बुलन्स टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नागरिकांना आवाहन
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धरण, नदी परिसरात फिरताना विशेष काळजी घ्यावी. पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेची साधने यांची खात्री करूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group