पिंपरी (Pclive7.com):- देशातील लाटेच्या विरोधात जाऊन शिरुर लोकसभेचा वेगळा निकाल लागला आहे. मागील निवडणुकीपेक्षा भोसरीतून विरोधकांचे ५० हजारांनी मताधिक्य कमी केले आहे. त्यामुळे कोणाला काहीही शंका असेल. परंतु, मला खात्री आहे, भोसरीचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी ते आले होते. त्यानंतर खासदार कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, एखादा इच्छुक पदाधिकारी मुलाखातीला गेला नाही म्हणजे तो पक्षासोबत नाही, असे होत नाही. काही कारणांमुळे मुलाखतीला जाता येत नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुलाखत देता आली नव्हती. परंतु, नाहकपणे संशयाचे वातावरण तयार केले जाते.
राष्ट्रवादीच्या होत असलेल्या गळतीवर बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, जे गेलेत त्यांच्याविषयी वाईट बोलण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तनाच्या मोठ्या टप्प्यावर आहे. पक्षात नवीन नेतृत्व तयार होत आहे. ही बदलाची वेळ आहे. या बदलासाठी पक्षाचे कार्यकर्ते जिद्दीने पेटले आहेत. पक्षाचे कार्यकर्ते आजही पवारसाहेबांसोबत आहेत, असेही ते म्हणाले.