पिंपरी (Pclive7.com):- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने लिहिण्यात आलेल्या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचं काम दिलं होतं, असा धक्कादायक आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर डॅशिंग आयपीएस अधिकारी तथा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांवर होणारे हे आरोप मनाला न पटणारे आहेत, असं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
शहरात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो… तो सरकारचा समर्थक असो वा विरोधातला, त्याच्याशी पोलिसांचा संबंध नाही. कारण गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, असं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलं आहे.
पिंपरी चिंचवडला भयमुक्त करणं हे आमचं टार्गेट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यातून वसुलीसंदर्भातलं पत्र व्हायरल झालं. त्या संबंधित प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, असं कृष्ण प्रकाश म्हणाले.