पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर-रहाटणीमधील बीआरटीएस मार्गातून सर्सासपणे दुचाकी आणि चार चाकी वाहनांची ये-जा सुरू असते. वाहतूकीचे नियम पायदळी तुडविले जातात. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गातील प्रत्येक चौकात सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे.
शत्रुघ्न काटे यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना मागणीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर-रहाटणी येथील बीआरटीएस मार्गावर भोसरी ते वाकड पीएमपीएमएल बसचे दळणवळण सुरू असते. परंतु या बीआरटीएस मार्गाचा वापर दुचाकी तसेच कार सुद्धा करीत आहेत.
प्रशस्त रस्ते असतांना देखील इतर वाहने या बीआरटीएस मार्गामधून ये-जा करण्यासाठी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत. वाहनचालक कसेही आपली वाहने या बीआरटीएस मधुन नेण्याचा प्रयत्न करतात. परिणामी या मार्गावर जीवघेणे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे नागरीकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
तरी या प्रभागात बीआरटीएस मार्गीके वरील प्रत्येक चौकात सुरक्षारक्षकांची नेमणुक करण्यात यावी. जेणे करूण बीआरटीएस मार्ग मधुन जाणा-या इतर वाहनांना मज्जाव करता येईल. आणि सतत होणारे जीवघेणे अपघात टाळता येतील, असे शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे.