प्रा.संपत गर्जे लिखित ‘शब्द आशयाचे घन’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पिंपरी (Pclive7.com):- मौनामध्ये दडलेला आशय बाहेर काढण्याचे काम कवी कवितेच्या माध्यमातून करीत असतो. कारण मौनातली शक्ती व्यतीत करावी लागते. असे प्रतिपादन ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.
कवी प्रा. संपतराव गर्जे लिखित ‘शब्द आशयाचे घन’ काव्यसंग्रह व अल्बमचे प्रकाशन संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आले, त्यावेळी भारत सासणे बोलत होते. माजी मुख्याध्यापक स्व. माणिकराव गर्जे प्रतिष्ठान तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे शिक्षण संचालक महेश पालकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लीलाताई गोविलकर, प.पू. शिवानंद स्वामी महाराज, उद्योजक विजय जगताप, कवी प्रा. संपत गर्जे, भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प अधिकारी सुरेश साळुंके, ह. भ. प. प्रवीण महाराज शेंडकर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, नंदकुमार सागर, रुपाली अवचरे, निखिल लंभाते, संतोष भंडारी, दिलीपकुमार देशमुख, संजय जाधव, जयवंतराव हापन, भानुदास वारे, दीपक गर्जे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना भारत सासणे म्हणाले, की अनुनय आणि उपासना या दोन्ही गोष्टींनी कवितादेवी प्रसन्न होते. पण अनुनय करणार्याकडे ती टिकत नाही तर उपासना करणार्या कवीकडे चिरंतन राहते. कविता ही अंतर्मनातून स्फुरत असल्याने कवींच्या सहवासात जीवंतपणा जाणवतो. कवी कधीच निवृत्त होत नाही, तो शेवटच्या श्वासापर्यंत लिहिता असतो, असेही भारत सासणे यांनी सांगितले.
डॉ. लीलाताई गोविलकर म्हणाल्या, की आज कोणताच कवी, साहित्यिक किंवा कविता, कादंबरी प्रातिनिधिक म्हणता येणार नाही. प्रा. गर्जे यांच्या काव्यसंग्रहातील कविता ही आकर्षित करणारी आहे. सुचकतेकडे आकर्षित करणारी आहे. जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, विश्वास कवितेतून दिला आहे. त्यामुळे त्यांची कविता ही शाश्वत चिरंतन वाटेकडे जाणारी आहे. ही कविता निसर्गात गुंतलेली नाही, तर निसर्गातील कल्पना घेऊन येणारी आहे.
महेश पालकर यांनी सांगितले, की प्रा. गर्जे यांनी वेगवेगळ्या अनुभवाच्या माध्यमातून कल्पनाशक्तीच्या जोरावर कविता लिहिल्या आहेत. तसेच अंतर्भूत कवितांचाही आढावा घेतला आहे.
राजन लाखे, कविता संग्रहाच्या प्रकाशिका रुपाली अवचरे, शिवानंद स्वामी महाराज, ह.भ.प. प्रवीण महाराज शेंडकर यांनीही विचार व्यक्त केले. दरम्यान, विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा माजी मुख्याध्यापक स्व. माणिकराव गर्जे प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला.
प्रा. संपत गर्जे प्रास्ताविकात म्हणाले, की अगदी शालेय वयापासून कविता वाचनाची आवड होती. त्यातूनच काव्य लेखनाची प्रेरणा मिळाली. आजूबाजूचा निसर्ग जीवनावर प्रभाव टाकीत होता. त्याचेच प्रत्यंतर पुढे काव्यलेखनात झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय लोंढे व वैशाली शिरसाट यांनी, तर दशरथ ढाकणे यांनी आभार मानले.