पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख भागात दुषीत पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आज महिलांनी हंडा मोर्चा काढण्यात आला. लवकरात लवकर स्वच्छ पाणी उच्च दाबाने पुरवठा करण्यात यावा अन्यथा पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, लाईनमन, वॉलमन यांना प्रभागात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा कामठे यांनी दिला आहे.
तुषार कामठे यांनी महिलांचा हंडा मोर्चा महापालिकेवर आणला असता पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना आऊट गेटवरच रोखले. आंदोलनकर्त्या महिलांना पालिकेत प्रवेश दिला नाही. हे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून पालिकेपर्यंत काढण्यात आले.
कामठे म्हणाले की, पिंपळे निलख, विशाल नगर, कस्पटे वस्ती, वाकड येथे गेल्या ५ वर्षापासुन पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या ५ वर्षामध्ये मी ४ वेळा आंदोलन व उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर काही प्रमाणात पाणी सुरळीत चालू झाले. परंतु, गेल्या ४ महिन्यांपासून पुन्हा माघचेच प्रयोग सुरू आहेत. करदात्या नागरीकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
परंतु, आज प्रशासनाच्या हातामध्ये सर्व गोष्टी आसताना कृत्रिम पाणीटंचाई होत आहे. ही शोकांतीका आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी यात लक्ष घालून हा प्रकार थांबवावा. कारण, पाणी टॅंकरची मुदत संपल्यामुळे पाणी टॅंकर नागरीकांना मिळत नाही. असा दोन्ही बाजुनी नागरीकांची कोंडी होत आहे. पाणी सुरळीत न झाल्यास पाणीपुरवठा आधिकारी, लाईनमॅन, यांना पिंपळे निलखमध्ये फिरू देणार नाही, असा इशारा कामठे यांनी दिला आहे.