युवक काँग्रेसचा “माझा प्रभाग, माझी शाखा” या उपक्रमातील राज्यातील पहिल्या शाखेचे वाकडमध्ये उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- केंद्रातील मोदी, शहा यांचे हुकुमशाही सरकार आणि घटनेची पायमल्ली करून महाराष्ट्रात आरूढ झालेले शिंदे, फडणवीस सरकार घालविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “माझा प्रभाग, माझी शाखा” हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या या उपक्रमातील राज्यातील पहिल्या शाखेचा उद्घाटन सभारंभ पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे यांच्या माध्यमातुन वाकड येथे होत आहे. हे उद्घाटन म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यात परिवर्तनाची सुरुवात आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी केले.
शुक्रवारी (दि.२९ जुलै) कृष्णा अल्लावरू यांच्या हस्ते वाकड, पिंपरी चिंचवड येथे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात “माझा प्रभाग, माझी शाखा” उपक्रमा अंतर्गत युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रभारी मितेंद्र सिंग, सहप्रभारी प्रतिमा मुदगल, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष कामगार नेते डॉ. कैलास कदम, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष सायली नढे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, सरचिटणीस अनिकेत नवले, सचिव अनिकेत आरकडे, शाखा अध्यक्ष विक्रम कुसाळकर राजश्री स्वप्निल बनसोडे, सत्यम मंडल तसेच असंख्य कार्यकर्ते महीला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी वाकड पोलिस स्टेशन ते पोलारस हॉस्पिटल परिसरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शाखा अध्यक्ष विक्रम कुसाळकर, उपाध्यक्ष रोहन मढिकर, सरचिटणीस पंकज सोनवणे, अरविंद क्षीरसागर, शेखर क्षीरसागर साहिल शेख, सचिव शिवानंद खंडागळे, अक्षय गायकवाड, इलाइक शेख आदींनी संयोजनात सहभाग घेतला होता.
यावेळी कृष्णा अल्लावरू म्हणाले की, एक काळ पिंपरी चिंचवडला स्वर्गवासी आण्णासाहेब मगर, माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचा वारसा लाभला आहे. त्यावेळी व माजी खासदार नानासाहेब नवले यांच्या कार्यकालात येथे काँग्रेसची एकहाती सत्ता होती. ते गतवैभव पुन्हा काँग्रेसला मिळवून देण्यासाठी सर्व युवकांनी काँग्रेसची ध्येय धोरणे घरोघरी जाऊन सांगावीत. भाजप सरकारमुळे महागाई, बेरोजगारी वाढत आहे. यामुळे युवकांमध्ये तीव्र असंतोष आणि अस्वस्थता आहे. परिणामी सर्व नागरिकांसह आता काँग्रेसच्या युवकांनी केंद्रातील भाजपा आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार घालविण्याचा संकल्प केला आहे. यासाठी युवकांचे संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. म्हणूनच “माझा गाव, माझी शाखा”, “माझा प्रभाग, माझी शाखा” उपक्रम युवक काँग्रेसने सुरू केला आहे. यामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असेही आवाहन कृष्णा अल्लावरू यांनी केले.
प्रास्ताविक शिवानंद खंडागळे, स्वागत स्वप्निल बनसोडे, सूत्र संचालन सुमित मंडल आणि आभार राजश्री बनसोडे यांनी मानले.