पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने समाज विकास विभागामार्फत कल्याणकारी योजना राबवित येते. शहरातील १० वी, १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत बक्षिस रक्कम दिली जाते. मात्र यावर्षी योजनेतील नियम-अटीतील फेरबदल करण्यात आले असून CBSE, ICSE आणि इतर मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. हा निर्णय या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. त्वरित या योजनेच्या नियम अटी शिथील करून पूर्वीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना पात्र करावे अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे.
शत्रुघ्न काटे यांनी यासंदर्भातील मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे. यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत समाज विकास विभागामार्फत कल्याणकारी योजना राबवित असतांना दरवर्षी इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांना बक्षीस रक्कम घोषित केली जाते. जसे की इ.१० वी मध्ये ८० % ते ९०% गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थांना र.रु १०,०००/- बक्षीस, इ.१० वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थांना र.रु १५,०००/- बक्षीस आणि इ.१२ वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थांना र.रु १५,०००/- बक्षीस रक्कम अशी वर्गवारी करून गौरव करण्यात येत होता. मागच्या काळात महापालिकेमार्फत ही बक्षिसे देताना कुठल्याही प्रकारची अटी व शर्ती विद्यार्थांना लागू नव्हते.
परंतू सन २०२१-२२ या वर्षातील समाज विकास विभागाच्या योजनेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांच्या योजनेच्या स्वरूपात खूप फेरबदल केले आहेत, जे पूर्णपणे अन्यायकारक आहेत. यावर्षीच्या बक्षीस योजनेच्या नियमावलीत फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्य मंडळ अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील व शिक्षण हक्क कायदा अंतर्गत शाळांमधली विद्यार्थांनाच या योजनेचा लाभ होणार आहे. परंतु CBSE, ICSE आणि इतर मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबत हा फार मोठा अन्याय आहे.
पिंपरी चिंचवड शहरात CBSE, ICSE आणि इतर मंडळातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांची संख्या महापालिका प्रशासन दुर्लक्ष करू शकत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत समाज विकास विभागामार्फत कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे हे शहरातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. आणि महापालिका प्रशासन हे हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत समाज विकास विभागामार्फत इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांना बक्षीस रक्कम योजनेत महाराष्ट्र राज्य मंडळ सोबतच CBSE, ICSE आणि इतर मंडळातून इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेत गुण वर्गवारी प्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांचा समावेश व्हावा.
तसेच शिक्षण हक्क कायदा अंतर्गत शाळांमधली विद्यार्थांना या योजनेचा लाभ मिळेल हे नियम पूर्णपणे शिथिल करून शहरातील प्रत्येक मंडळातून महापालिकेने ठरवलेल्या गुण वर्गवारी प्रमाणे उत्तीर्ण झालेल्या इ.१० वी व इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांना या योजने करिता पात्र करावे अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी केली आहे.